निवडणुकीच्या तोंडावरच सचिन वाझेचे पत्र कसे ?

0
images (82)

मुंबई दि. ४ ऑगस्ट;

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपामधील एकही आरोप सिद्ध झालेला नाही मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे पत्र आरोप प्रत्यारोप कसे काय येते असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, या पत्राची वेळ बघा, विधासभेच्या निवडणुका दोन महिन्यावर आल्या आहेत. इतके वर्षे गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांची सत्ता आहे. गेली दहा वर्षे यांची सत्ता आहे. या गोष्टी आताच कशा काय येतात? गेली अडीच वर्षे त्यांचे सरकार महाराष्ट्रात आहे. बरोबर विधानसभेआधीच हे पत्र, आरोप-प्रत्यारोप कसे काय येतात? अनिल देशमुख यांच्याविरोधातील एकही आरोप सिद्ध झालेला नाही. ते सगळे खोट ठरलेले आहे. १०० कोटी रुपयांच्या आरोपाचे काही झालेले नाही. त्यामुळे आता दुसऱ्या कोणाची यात नाव म्हणजे मला आता हे सगळे बालिशपणाचे वाटत आहे, असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

 

सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ झाले आहे, बालिशपणाचे आरोप केले जात आहेत.आमचा पक्ष सुसंस्कृत आहे. गलिच्छ गोष्टी आम्ही कधी केल्या नाहीत. भाजपाची स्टाइल आहे ही आधी आरोप करायचे नंतर त्यांनाच आपल्या पक्षात घ्यायचे. पत्र कोणी लिहिलंय? कधी लिहिलंय? मीही उद्या पत्र लिहून आरोप करेन, असं नसतं आयुष्य खूप सिरिअस आहे. आम्ही कधीही खोटे आरोप करत नाही. आम्ही बदल करण्यासाठी राजकारणात आलो आहोत.

 

संजय राऊत, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ या सर्व नेत्यांना त्यांनी किती त्रास दिला, ते मी पाहिलं आहे, भारतीय जनता पार्टीने ज्या १२ लोकांवर आरोप केले होते ते आज कुठे आहे. आजचे राजकारण खूप गलिच्छ झाले आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे बाहेर आले आहे. निवडणुकीच्या आधी पत्र आणि नाव त्यांनी का घेतलं असाही सवाल यावेळी सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती, धोरणे, महागाई बेरोजगारी, भ्रष्टाचार यांवर लक्ष देणे गरजेचे आहे. आम्ही कधीच कोणावर आरोप केले नाहीत. आरोप केलेले ते शंभर कोटी कुठे आहेत. मग आरोप खोटा ठरला ना, ज्यांनी देशमुखांवर आरोप केले ते आज कुठे आहेत. असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आणि महाराष्ट्रात वाढणारी बेरोजगाराची परिस्थिती यावरही कोणीतरी बोललं पाहिजे. पण त्यावर कोणीही बोलत नाही. भ्रष्ट्राचार झाकण्यासाठी भाजपाचं वाशिंग मशीन आहे. आमचा पक्ष सुसंस्कृत पक्ष आहे. आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर चालणारे लोक आहेत. आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आणि समाजकारणात आलो आहोत. अशा प्रकारे कोणाचा बदला घेण्यासाठी किंवा अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण आम्ही कधी करत नाहीत आणि पुढेही कधी करणार नाही. अशा प्रकारचे आरोप आम्ही कधीही कोणावरही केले नाहीत. अनिल देशमुख यांच्यावरील आरोप खोटे आहेत असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *