उद्धव ठाकरेंनी औरंगजेबाचे विचार व स्वरूप स्वीकारले..
वर्धा, दि. ३ ऑगस्ट ;
हिंदूंना हिंसक म्हणणारे राहुल गांधी उद्धव ठाकरे यांना चालतात, पण ३७० कलम रद्द करून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणारे मोदीजी चालत नाहीत, अशी आक्रमक टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
भाजपा जिल्हा अधिवेशनासाठी वर्ध्यात आले असताना बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी औरंगजेबाचे विचार व स्वरूप स्वीकारले आहेत. त्यांच्या तोंडी ती भाषा आली आहे. म्हणूनच त्यांनी राजकारणाची खालची पातळी गाठली आहे. उद्धव ठाकरे यांची आमचे नेते अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलण्याची लायकी नाही. त्यांच्याबद्दल बोललेले महाराष्ट्रातील जनता सहन करणार नसून उद्धव ठाकरे यांना चांगलाच धडा शिकवेल. उद्धव यांच्यासोबत बसणारे राहुल गांधी हिंदूंना हिसंक म्हणतात. या भूमिकेवर उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले पाहिजे. उद्धव ठाकरेंच्या आरेवर कारे उत्तर तयार आहे.
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा येईल, असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहिण, वीज बिल माफी व इतर लोककल्याणाच्या योजना बंद पाडल्या जातील. २०४७ पर्यंत भारतात भाजपाचे सरकार सत्तेत राहणार असल्याचा दावा देखील करतानाच विरोधकांचा खोटारडेपणा उघड पाडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
