20231130_111009

सांगली, दि ३० जुलै :-

राज्य शासनाने एक शासन आदेश जारी करून तब्बल २७० कोटी रुपयांची तरतूद शासकीय योजनांच्या ‘विशेष प्रसिद्धी मोहिमेसाठी’ केली आहे. वास्तविक ही विशेष प्रसिद्धी मोहिम नसून ‘निवडणूक प्रसिद्धी मोहीम’ आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.

स्वतःचा प्रचार करण्यासाठी सरकारी तिजोरीतले पैसे वापरले जात असल्याचा आरोप करताना जयंत पाटील म्हणाले की, निवडणुकांच्या निकालाचा अंदाज आल्याने सत्ताधारी पक्ष आता प्रचंड खटाटोप करत आहे. येनकेन मार्गाने स्वतःची प्रसिद्ध करण्याचे काम केले जात आहे. सत्ताधारी स्वतःची जितकी प्रसिद्धी करतील तितका सामान्य जनतेच्या मनात त्यांच्याबद्दलचा राग वाढत जाईल असे भाकित त्यांनी केले.

एकीकडे राज्यभरातील रस्त्यांची चाळण झाली आहे, जे नवे रस्ते बांधले गेले त्याला भेगा पडल्या आहेत, एसटी महामंडळाच्या बसेसची अवस्था बिकट आहे, शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे, राज्यातील शासकीय शाळांची दुरवस्था झाली आहे. पीएचडीचे विद्यार्थी आंदोलन करत आहे. राज्यावर जवळपास ८ लाख कोटी रुपयांचा बोजा आहे. तरीही सरकार २७० कोटी रुपये हे स्वतः च्या प्रसिद्धीसाठी वापरणार आहे. आता वर्तमानपत्र, एसटी बसेसवर हेच दिसणार. सरकारच्या या योजना म्हणजे स्वतःचे पूनर्वसन करण्यासाठीचा कार्यक्रम आहे असे यातून स्पष्ट होतं असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *