पेशवाई आणण्याचा प्रयत्न कदापी खपवून घेणार नाही:
मुंबई, दि. २२ जून :
नाशिकमध्ये दलित समाजाविरोधात पत्रके वाटण्यात आली असून चातुर्वर्ण्य व्यवस्था आणण्याचा हा प्रयत्न दिसत आहे. शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सामाजिक द्वेष पसरवणारे जातीवाचक प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. काही विकृत्त प्रवृत्ती महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत पण तो यशस्वी होऊ दिला जाणार नाही. पत्रकातील भाषा पाहता महाराष्ट्रात पेशवाई आणण्याचा काही समाज विघातक लोकांचा प्रयत्न दिसत आहे पण तो हाणून पाडू, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
पुणे येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा सरकारवर सडकून टीका केली, ते पुढे म्हणाले की, नाशिकमध्ये दलित समाजाच्या विरोधात वाटण्यात आलेले पत्रक हा या समाजाचा अपमान करणारे आहे. अशा प्रकारच्या घटना सरकारच्या आशिर्वादाने होत असतील तर त्या तातडीने थांबवा आणि ज्यांनी हे पाप केले आहे त्यांच्या मुसक्या आवळून कठोर शिक्षा करा. या पत्रकारावर पत्रक प्रसिद्ध करणाऱ्याचे नावही आहे. राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून अशा प्रवृत्तींना ठेचून काढले पाहिजे. काँग्रेस पक्ष या प्रकारच्या प्रवृत्तीचा तीव्र निषेध करत आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
