महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्र फडणविसांकडेच!
मुंबई, दि. १९ जून:
महाराष्ट्रात भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असून तेच राज्याचे नेतृत्त्व करतील, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. सर्व विधिमंडळ सदस्यांनी आणि प्रदेश भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करण्याची विनंती केली आहे.
नागपूर विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते.बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पुढील पाच वर्षांच्या महाराष्ट्र विकासाच्या योजना त्या महाराष्ट्रात आणण्यासाठी महायुतीचे सरकार काम करेल, त्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये आवश्यक आहेत. दिल्लीमध्ये भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या चर्चेविषयी ते म्हणाले की, ज्या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अर्धा टक्केपेक्षा कमी मतांनी मागे राहिला, त्याविषयी केंद्रीय नेतृत्वासोबत कारणांची चर्चा व विचार विनिमय केला. जेथे कमी पडलो आहोत, त्या ठिकाणी अधिकचे काम करून विधानसभेत ही पोकळी भरून काढण्यासाठी काम करू, असेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या पाठबळाबद्दल धन्यवाद व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात भाजपा धन्यवाद यात्रा काढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पुढील ५ वर्षात होणारी विकासकामे व योजनांचा लाभ महाराष्ट्रातील जनतेला व महाराष्ट्राच्या विकासासाठी व्हायला हवा. महाराष्ट्रातील सर्व आमदार-खासदार, संघटनेतील सर्व पदाधिकारी जुलै महिन्यात धन्यवाद आभार दौरा करणार आहे, ज्या मतदारांकडे आम्ही मत मागण्यासाठी जाऊ त्यांना मोदी सरकारच्या नवीन योजना देखील पोहचवणार आहोत.
पंतप्रधान मोदींनी एखाद्या शब्दाने टीका केली, तुम्ही मागील दीड वर्षापासून मोदींना काय काय बोलत आहात… महाराष्ट्राच्या जनतेनेही नोंद घेतली आहे. यशाने ते थोडे हुरळले आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर किती खालच्या पातळीवर टीका करण्यात आली या गोष्टीचा अभ्यास शरद पवार यांनी केला पाहिजे. अत्यंत तुच्छ आणि गलिच्छ पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक टीकाटिप्पणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे.
शरद पवार यांनी या गोष्टीचे आकलन केले पाहिजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्द बोलले तर एवढे लागले, महाविकास आघाडीच्या लोकांनी नरेंद्र मोदी यांना काय काय बोलले आहे या गोष्टीचे आकलन शरद पवार यांनी केली पाहिजे.
