…हे तर सरकार आणि BMC पुरस्कृत खून.
मुंबई दि.१५ मे :-
मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेला महायुती सरकार आणि मुंबई महानगरपालिका जबाबदार आहे. महायुती, मुंबई मनपाच्या भ्रष्टाचारामुळे निष्पापांचा बळी गेला आहे. होर्डिंग दुर्घटनेतील बळी म्हणजे सरकार आणि मुंबई मनपा पुरस्कृत खून असून महायुती भ्रष्टाचाराच्या चिखलात रुतली आहे. याच चिखलात कमळ फुलविण्याचा केविलवाणा प्रयत्न महायुती करत असल्याचा हल्लाबोल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. त्याचबरोबर दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी सावंत यांनी केली आहे.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी मुंबई काँग्रेस कार्यालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महायुती सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढले.
सावंत म्हणाले की, मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. या शहरात होर्डिंग पडून निष्पाप माणसांचा जीव जातो यासारखं दुर्दैव नाही. घाटकोपर येथे अनधिकृतपणे एवढे मोठे होर्डिंग उभे राहत असताना आणि गिनीज बुक मध्ये यांची नोंद केली जात आहे अशी चर्चा असताना प्रशासन का गप्प होते याचे देखील उत्तर मिळालं पाहिजे. जागा राज्य सरकारची आहे असे समजते. मग राज्य सरकारचाही यात दोष आहे. महानगर पालिकेचे अधिकारी काय करतात हा प्रश्न आहे. की यांच्या डोळ्यावर भ्रष्टाचाराची पट्टी आहे. हे जनतेला कळलं पाहिजे.
होर्डिंग उभारणीत मोठा भ्रष्टाचार असल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. परंतु संवेदना गमावलेल्या सरकारला याबद्दल काहीही वाटणार नाही. केवळ चौकशीचे आदेश देऊन सरकार हात वर करत आहे. सरकारने चौकशीचा फार्स न करता दोषींवर कठोर कारवाई करावी. पंतप्रधान मुंबईत प्रचाराला येत आहेत. त्याआधी त्यांनी दुर्दैवी परिवाराचे अश्रू पुसावे. पीएमकेअर्स फंडाचा हिशोब ते देत नाहीत पण अशा घटनेला मदत तरी जाहीर करा असे सावंत म्हणाले.
