महायुतीच्या भगव्या वादळात विरोधक भुईसपाट होणार
मावळ, ता. १२ मे ;
नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची गॅरंटी मतदारांनी घेतली आहे. त्यामुळे महायुतीचे राज्यात ४५ हून अधिक उमेदवार विजयी होतील. राज्यातील सर्वच लोकसभा मतदार संघात भगवे वादळ घोंगावत असून यात विरोधक भुईसपाट होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सकाळी प्रचंड रॅली काढण्यात आली. संध्याकाळी ठाणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी भाईंदर पूर्वेकडील नवघर नाका येथून सुरु झालेल्या प्रचार रॅलीला मतदारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. या दोन्ही रॅलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला मतदारांना आवाहन केले आहे. त्याप्रमाणे महिलांनी सकाळी लवकर मतदान करावे. त्यानंतर घरातील इतर लोकांनी मतदानासाठी जायचे आहे. नवीन संसद भवनामध्ये पहिला निर्णय महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. एक एक मत महत्वाचे आहे. एक मत देश घडविणार आहे. एक मत देशाच्या विकासाचे आहे आणि एक मत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचे आहे, असे ते म्हणाले.
विरोधकांकडे झेंडा नाही आणि अजेंडा देखील नाही. विरोधक सैरभर झाले असून त्यांची पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्याकडून संविधान बदलणार असे बिनबुडाचे आरोप केले जातात. पण जोवर चंद्र सुर्य आहे तोवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान कायम राहील. त्यामुळे विरोधकांच्या खोट्या प्रचाराला जनतेला थारा देऊ नये, असे मुख्यमंत्री म्हणाले. राज्य आणि केंद्र सरकारने देखील अनेक विकास कामे केली आहेत. त्या विकासकामांच्या जोरावरच जनता मत देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
उन्हाळ्याच्या कडाक्याच्या उन्हात गर्दी केली आहे. हे लोकांचे सरकार आहे. त्यामुळे या कामाच्या जोरावर मतदार महायुतीला भरभरुन मतदान करतील. राज्यात महायुती ४५ अधिक जागा जिंकेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. पहिल्या तिन्ही टप्प्यात महायुतीला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
