ईडीचा सर्वात मोठा बळी महाराष्ट्र..
मुंबई, दि. ११ मे ;
भाजपा सरकारने १० वर्षात विरोधी पक्षांना संपवण्यासाठी ईडी, सीबीआयचा प्रचंड गैरवापर केला. ईडीच्या गैरवापराबद्दल भाजपाचे किरीट सोमय्या यांनीच जाहीरपणे सांगितले तसेच देवेंद्र फडणवीस यांनी बदला घेतला असे सांगून भाजपाने दडपशाहीचे राजकारण कसे केले हे स्पष्ट केले आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी कोणतेही पुरावे नसताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. ईडीचा सर्वात जास्त बळी महाराष्ट्र ठरला असून ईडीच्या मदतीने दोन पक्ष फोडले व मविआचे सरकारही पाडले, असा घणाघाती आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला.
मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. भाजपाने ईडीचा किती अतिरेकी वापर केला हे सांगताना सावंत यांनी आमदार रविंद वायकर यांचा दाखला दिला. एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत चुकीच्या प्रकरणात कसे गोवले गेले. दबाव असल्याने जेल किंवा पक्ष बदल हेच पर्याय होते आणि पत्नीलाही गोवल्यामुळे पर्याय नव्हता असे वायकर यांनी सांगितले, रविंद्र वायकर यांच्यावर ही वेळ नियतीने नव्हे तर महाशक्तीच्या नीतीने आणली आहे. एकनाथ शिंदे गटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनीही ईडीचा गैरवापर थांबवा असे सांगितले. आता वायकरांनी स्वतः उघड पाडलेले भयानक राजकीय ब्लॅकमेलचे प्रकार मुंबईकरांनी सहन करु नयेत असे आवाहन सावंत यांनी केले.
भाजपाने ईडी सीबीआयचा खुलेआम वापर केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सुप्रीम कोर्टाने जामीन दिला असला तरी केजरीवाल यांना जामीन मिळू नये अशी ईडीने तरतूद केली होती. विरोधकांचे पक्ष संपवावेत, त्यांना प्रचार ही करता येऊ नये हे भाजपाचे षडयंत्र होते. सर्वोच्च न्यायालयाने लोकशाहीविरोधी भाजपाचे हे षडयंत्र उलथून टाकले आहे असे सावंत म्हणाले.
मुंबईतील लढाई ही सुटाबुटातील तसेच आरोपी उमेदवार विरुद्ध गोरगरिबांचे जनप्रतिनिधी अशी आहे. सुटाबुटातील उमेदवार उज्वल्ल निकम यांनी वांद्र्याची धारावी करायची नसेल तर मला मत द्या, असे म्हणून धारावीकरांचा अपमान केला. धारावी हे आर्थिक विकासाचे केंद्र आहे, त्याला हिणवले आहे तर झोपडपट्टीतील लोकांनी खार जमिनीवर रहायला जावे अशी पियुष गोयलांची भूमिका आहे. रेल्वे मंत्री असताना पियुष गोयल यांनी कोरोना महामारीमध्ये मुंबई व महाराष्ट्रातील गरीबांची अडवणूक केली हे महाराष्ट्र विसरला नाही. महायुतीचे काही उमेदवार उच्चभ्रू लोकांचे प्रतिनिधित्व करतात ते सामान्यांचे प्रश्न कसे सोडवणार तसेच काही ईडी, सीबीआयच्या कारवाया झालेले उमेदवारही आहेत आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार हे सामान्य गोरगरिब समाजाचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. जनतेच्या प्रश्नासाठी इंडिया आघाडीचे उमेदवारच कामाला येऊ शकतात. देशातील वातावरण इंडिया आघाडीसाठी प्रचंड अनुकूल आहे. असेही सावंत म्हणाले.
या पत्रकार परिषदेला मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते निजामुद्दीन राईन, आनंद शुक्ला, शकील अहमद व अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महाराष्ट्राचे मिडिया समन्वयक संदिप त्रिपाठी उपस्थित होते.
