वर्षा गायकवाड यांचा LTT वर प्रवाशांशी संवाद.
मुंबई, दि. ९ मे :
भाजपा सरकार विकासाची कामे केल्याचा दावा करते पण वस्तुस्थिती वेगळी आहे. वंदे भारत रेल्वे सुरु केलाचा ढोल बडवता परंतु नेहमीच्या रेल्वे वेळेवर सुटत नाहीत, रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी साध्या सुविधाही नाहीत. रेल्वे १०-१५ तास विलंबाने सुटतात, हा विकास आहे का? १० वर्षे सत्तेत राहून मोदी सरकारने काय काम केले? रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी सुविधा सुद्धा देता आल्या नाहीत, असा संताप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष व उत्तर मध्य मुंबई मतदार संघाच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.
प्रा. वर्षा गायकवाड यांनी लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनला भेट देऊन प्रवाशांशी संवाद साधला, प्रवाशांच्या समस्या ऐकून घेतल्या, रेल्वेच्या डब्यात जाऊन स्वच्छता आहे का याचा पाहणी केली व स्टेशन मास्तर य़ांना भेटून जाब विचारला. रेल्वे स्टेशनवर प्रवाशी तासंतास रेल्वेची वाट पहात बसतात त्यांच्यासाठी रेल्वे स्टेशनवर कोणतीही व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. दूर अंतरावर जाणाऱ्या काही रेल्वे १५ तास, ३० तास उशिराने धावत आहेत. सामान्य प्रवाशांनी करायचे काय, कुठे थांबायचे, त्यांच्या विश्रांतीसाठी काहीही सोय नाही. मुंबई शहरातील एका महत्वाच्या रेल्वे स्टेशनवर ही अवस्था आहे तर इतर रेल्वे स्टेशनवर काय परिस्थिती असेल.
वंदे भारत रेल्वे सुरु केल्याचा ढोल बडवतात पण इतर रेल्वेंचे काय, रेल्वे प्रवाशाच्या सोयीसुविधांचे काय, १० वर्षे भारतीय जनता पक्षाच्या सरकारने काय केले, विकासाच्या केवळ थापा मारुन जनतेची दिशाभूल केली आहे. २०-२२ उद्योगपतींचा विकास म्हणजे देशाचा विकास नव्हे. रेल्वे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून रेल्वे वेळेवर सुटतील याकडे लक्ष द्यावे व प्रवाशांना योग्य त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशा सुचनाही प्रा, वर्षा गायकवाड यांनी केल्या.
