मराठी माणसाला नोकरी नाकारणाऱ्या कंपनीवर कारवाई करा.

0
20240314_085058

मराठी माणसाला नोकरी नाकारणाऱ्या कंपनीवर कारवाई करा.

मुंबई, दि. ६ मे :

मुंबईत मराठी माणसाला घर नाकारणे, दुकानावर मराठी पाट्या न लावणे, मराठी न बोलणे हे प्रकार असताना आता मुंबईतच मराठी माणसाला नोकरी नाकारण्याचे धाडस कंपन्या करु लागल्या आहेत. ITCODE Infotech या कंपनीने चक्क मराठी लोकांनी अर्ज करु नयेत अशी जाहिरात करण्याचे धाडस केले. भाजपाचे सरकार आल्यापासून असा मराठीद्वेष उफाळून आला आहे, अशा मुजोर कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याची हिम्मत भाजपा-शिंदे सरकारने दाखवावी अन्यथा रस्त्यावर उतरून जाब विचारा लागेल, असा इशारा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिला.

 

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ITCODE Infotech ही कंपनी सुरतची आहे. गिरगावातील कार्यालयासाठी या कंपनीने ग्राफिक डिझायनर पदासाठी जाहिरात दिली पण मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये, असे त्यात स्पष्ट म्हटले. मराठीबहुल वस्ती असलेल्या गिरगावातच मराठी माणसाला नोकरी देणार नाही, असा उद्दामपणा ही कंपनी करु शकली कारण राज्यातील सत्ताधारी भाजपा व शिंदे सरकार गुजरातचे हस्तक आहेत. मोदी-शाह व गुजरात विरोधात ठाम भूमिका घेण्याची धमक त्यांच्यात नाही. परंतु हा मुजोरपणा व मराठी स्वाभिमानाला कोणी ठेच पोहचवत असेल तर ते सहन केले जाणार नाही.

 

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेले, या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘गुजरात राज्य काही पाकिस्तान नाही’, असे बेजबाबदार व निर्लज्ज उत्तर दिले होते. अशा या बोटचेप्या व गुजराती धार्जिण नेत्यांमुळेच माज वाढत चालला आहे. गुजरात पाकिस्तान नाही हे जसे समजते तसे मुंबईसुद्धा पाकिस्तान नाही याचे भान फडणवीसांना असायला हवे. आणि महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्यांना गुजरातचा एवढा पुळका का यावा? अशा गुजरातप्रेमी लोकांना त्यांची जागा दाखवून देण्याची हिच योग्य वेळ आहे, असे आवाहनही वर्षा गायकवाड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *