वडेट्टीवारांचा प्रचार करण्याचा अधिकार काढून घ्या.
मुंबई, दि. ६ मे :
मुंबईतील २६/११ च्या पाक पुरस्कृत दहशदवादी हल्ल्यात शहीद हेमंत करकरे यांना लागलेली गोळी कसाबच्या बंदुकीतून लागली नव्हती तर ती गोळी आरएसएस समर्थक पोलीस अधिकाऱ्याने चालवली होती, असा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. एका पुस्तकाचा आधार घेत वडेट्टीवार यांनी हा आरोप केला आहे. तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी गलिच्छ पातळी गाठणाऱ्यांचा ‘निवडणूक प्रचार’ करण्याचा अधिकार काढून घ्यावा आणि विजय वडेट्टीवर यांच्या विरोधात FIR दाखल करावा, अशी मागणी मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे.
विजय वडेट्टीवार यांचे शहीद हेमंत करकरे यांच्या हौतात्म्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दोषी धरणे म्हणजे मृताच्या टाळूवरील लोणी खाणे असल्याचे रोखठोक मत राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे. एक्स (ट्वीटर) च्या माध्यमातून त्यांनी विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल स्पष्ट मत मांडले आहे.
देशभक्तांना धारेवर धरणे आणि दहशतवाद्यांचा उदोउदो करण्याची काँग्रेसी वृत्ती पुन्हा एकदा आज चव्हाट्यावर आली आहे! आपल्या तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी गलिच्छ पातळी गाठणाऱ्यांचा ‘निवडणूक प्रचार’ करण्याचा अधिकार काढून घ्यावा आणि विजय वडेट्टीवर यांच्या विरोधात FIR व्हावी अशी मागणी मंत्री लोढा यांनी यावेळी केली आहे.
