महाराष्ट्र अधिक समृद्ध, समर्थ करूया.
मुंबई दि. १ मे :
महाराष्ट्राच्या भूमीने देशाला विचार दिला, आदर्श दिले, संविधान दिले. अशा या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मला जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्याची संधी मिळणे, हे मी माझे भाग्य समजतो. अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्रदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे ऋण फेडण्यासाठीच सत्ताकारण करण्याचे आपणांस वचन देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या समर्थ साथीचे आवाहनही केलं आहे.
देशाची आर्थिक, सांस्कृतिक राजधानी असलेला आपला महाराष्ट्र. कला, साहित्य, संस्कृती, बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रांतील रत्नांची खाण असलेले आपले महान राज्य. त्याचबरोबर हिताच्या आड येणाऱ्यास चौदावे रत्न दाखवणाराही महाराष्ट्रच’’ अशा यथार्थ शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र प्रतिमा आपल्या शब्दांत मांडली आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, शाहू, फुले आंबेडकर यांचा विचार आमच्याजवळ आहे. याच विचारांच्या प्रकाशात आम्ही पुढील मार्ग दिसणार आहे.’’ अशी विश्वासहमी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी हुतात्मा चौकात जाऊन 106 हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले. यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिले, त्यानंतर मंगल कलश महाराष्ट्रात आला तो आजचा दिवस, हुतात्मा स्मरकाकडे आल्यावर ऊर्जा, प्रेरणा मिळते, या 106 हुतात्म्यांचे बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाही. या राज्याने देशाला विचार दिले, संविधान दिले. 65 वर्षांचा पल्ला आपण गाठला आहे पण अजून बरेच काही करणे बाकी आहे. गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात अनेक विकासप्रकल्प वेगाने मार्गी लागले आहेत त्यामुळे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास हाच ध्यास आहे. राज्यातील गोरगरीब, कष्ट करणारे माता भगिनी यांच्या आयुष्यात आनंद आणणे हीच या हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल आणि त्यासाठी आमचे सरकार काम करत असल्याचे सांगितले.
“महाराष्ट्राच्या या परंपरेशी इमान राखूनच मी गेली दोन वर्षे या राज्याची धुरा सांभाळतो आहे. शेतकरी, महिला, आदिवासी, युवकांच्या प्रगतीची दारे उघडावीत, त्यांना आकाश खुले व्हावे यासाठी माझे प्रयत्न सुरू असतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा आशीर्वाद आमच्या मागे आहे. देशाचे यशस्वी, लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सहकार्यातून महाराष्ट्राने प्रगतीची कास धरली आहे”. असे सांगत महाराष्ट्राच्या सुराज्यपर्वाची वाटचाल ही एकसंघ सुरु असून भविष्यात हाच प्रगतीचा मार्ग असेल हा विश्वास महाराष्ट्राला दिला आहे.
