मुंबईत श्रद्धा वालकर घटनेची पुनरावृत्ती!
मुंबई, २९ एप्रिल :
मानखुर्द येथील साठेनगर परिसरात राहणाऱ्या पूनम क्षीरसागर नामक मातंग समाजातील तरुणीचा मृतदेह तुकडे करून एका सुटकेसमध्ये भरून निर्जनस्थळी ठेऊन देण्यात आला होता. निजाम नामक टॅक्सी ड्रायव्हर तिला १८ एप्रिलला पळवून घेऊन गेला आणि कल्याणमध्ये तिची हत्या केली. दोन दिवसांपूर्वी ही घटना उघडकीस आली. स्थानिकांमध्ये या घटनेविरुद्ध आक्रोश असून त्यासंदर्भात स्थानिकांनी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट घेतली. सदर प्रकार कानावर येताच पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मानखुर्द येथे जाऊन पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली आणि त्यांच्या संरक्षणासाठी महत्वपूर्ण निर्देश दिले आहेत. पूनमचा दुर्दैवी मृत्यू ही श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनवरावृत्ती असून अतिशय दुःखद घटना आहे. प्रकरणातील आरोपी निजाम याला अटक झाली असली तरी त्याचे साथीदार अजून फरार आहेत.
“मातंग समाजातील बहिणींना फसवलं जातंय, आमच्या भगिनींची कट्टरपंथीयांकडून निघृण हत्या केली जातेय, हे अतिशय क्लेशदायक आहे. मालवणी, चेंबूर, अंधेरीनंतर आता आपल्या शहरातील ही चौथी घटना आहे, त्यामुळे पोलिसांना याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही! या समाजकंटकांच्या विरोधात लढा देण्यासाठी सकल हिंदू समाज एकत्र झाला असून, सरकार आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करेल. तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबईत अनधिकृतपणे राहणाऱ्या रोहिंग्या, बांग्लादेशींचा बंदोबस्त करावा लागेल!” असे पालकमंत्री लोढा यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.
