सुनिल तटकरेंनी एका ट्रस्टची जमीन हडपली!

0
images - 2024-04-18T110442.599

मुंबई दि. १८ एप्रिल:

रायगड येथे मुस्लिम समाजातील महिलांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या ट्रस्टची जमीन हडपण्यामागे अजित पवार गटाच्या सुनिल तटकरे यांचा हात आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कागदपत्रांच्या पुराव्यासह मुंबईतील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.

मुस्लिम समाजातील महिलांच्या शिक्षणासाठी डॉ. उंद्रे यांनी उभारलेला ट्रस्ट ताब्यात घेऊन ट्रस्टची ५० कोटी रुपयांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न झाला आहे. यामागे सुनील तटकरे यांचा हात आहे. डॉ. उंद्रे यांनी अल्पसंख्याक महिलांनी शिकले पाहिजे, यासाठी या जमिनीवर शाळा, कॉलेज उभारण्याच्या हेतूने जमीन दिली होती. पण, या ट्रस्टवर आपल्या मर्जीतील लोकांना बसवून डॉ. उंद्रे यांच्या नातेवाईकांच्या खोट्या सह्या करून ट्रस्ट ताब्यात घेतला आहे. या सर्वा मागे खासदार सुनील तटकरे यांचा हात आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

जाणून बुजून अल्पसंख्यांक, मागासवर्गीय समाजाला त्रास देण्याचे काम सुरु आहे. ट्रस्ट हड्पणार हे आणि उलट डॉ. उंद्रे यांच्या पत्नीलाच तडीपारीची नोटीस पाठवण्यात आली. या राज्यात कोणालाही तडीपार केले जातेय. तडीपार करण्याचे कोणते नियम राहिले नाहीत. ७८ वर्षे वयाच्या वृद्ध महिलेला तडीपारीची नोटीस पाठवली जाते. हीच का राज्यात महिलांची किंमत राहिली आहे? कुठे आहे या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था, असा सवाल आव्हाड यांनी केला.

महाराष्ट्रात महिलांची स्थिती द्रौपदी सारखी होईल असे महायुतीचे नेते म्हणतात आणि पुन्हा चुकून बोललो म्हणतात. हे वाक्य तुमच्या तोंडून चुकून कसं काय जाईल तुम्ही कधीच महिलांचा आदर करत नाही आणि करतही नव्हता म्हणूनच तुम्ही महाराष्ट्रात महिलांची स्थिती द्रौपदी सारखी होईल, असं वक्तव्य करता आणि मग माफी मागता असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

महाविकास आघाडीचा जाहीरनामा लवकरच जाहीर होणार आहे. आमचा जाहीरनामा राष्ट्रहिताचा आणि जनतेसाठी असणारा असेल. महाराष्ट्र कधीही दिल्ली समोर चुकला नाही आणि कधी दिल्ली समोर आम्ही झुकत नाही. सध्या राज्यातील अनेक उद्योग गुजरातला जात आहे. आमचे उद्योग राज्याबाहेर शरद पवार यांनी कधीच जाऊ दिले नाही असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *