डाॅ. राजू वाघमारेंकडून आंबेडकरी विचारांशी द्रोह.
मुंबई, दि. ९ एप्रिल:
डॉ. राजू वाघमारे हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्ते पदावर कार्यरत होते. मुंबई कॉंग्रेसशी त्यांचा संबंध नव्हता. मात्र मागील काही महिन्यांपासून ते प्रदेश कॉंग्रेस मध्ये सक्रीय नव्हते. इडी, आर्थिक गुन्हे किंवा आर्थिक लाभ या दोनच कारणासाठी लोक भाजपा किंवा शिंदे सेनेत प्रवेश करतात. बीबीडी चाळींच्या माध्यमातून वाघमारेंनी आर्थिक संबंध जोपासण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला असावा, असा आरोप मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते यांनी केला आहे.
काँग्रेस पक्षात सर्व जाती धर्मांच्या प्रतिनिधींना संधी दिली जाते. डॉ. राजू वाघमारे यांनाही काँग्रेस पक्षाने सातत्याने जबाबदारीची पदे दिली. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, प्रवक्ता, एस. सी. विभागाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष, राजस्थानच्या सोशल मीडियाचे प्रभारी, मीडिया समितीचे सदस्य अशा विविध जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. सध्या लोकसभा निवडणुका सुरु असताना पक्ष सोडून जाणे हा पळपुटेपणा असून पक्षासाठी काहीही काम न करता केवळ पदे उपभोगणारे लोकच पक्षावर नाहक आरोप करून पक्ष सोडतात. पक्षात घुसमट होत असल्याने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला हा राजू वाघमारे यांचा आरोप हास्यास्पद आहे. लालसेपोटी राजू वाघमारे यांनी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले पण जे लोक हे संविधान विरोधी कळपात वाघमारे गेले हा आंबेडकरी विचारांशी द्रोह आहे, असे युवराज मोहिते यांनी सांगितले आहे.
