उद्धव ठाकरेंचा गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा.
मुंबई, दि २ एप्रिल :
उबाठा गटाचा गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत काँग्रेस समोर मुजरा सुरू आहे अशी टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. यासाठी आ. ॲड. आशिष शेलार यांनी प्रसिद्ध गझलकार चंद्रशेखर सानेकर यांच्या गझलेतील शिंग फुंकले तेव्हा नुसता बॅनर लावुन आले..! या शेरचा दाखल देत उबाठा गटावर शरसंधान साधले.
आशिष शेलार म्हणाले की, उबाठा गटाचा गल्लीत “गोंधळ” आणि दिल्लीत काँग्रेस समोर “मुजरा” सुरु आहे. त्यावर प्रसिद्ध गझलकार चंद्रशेखर सानेकर यांच्या गझलेतील काही समर्पक शेर. आशिष शेलार यांनी वाचून दाखवले आहेत.
आशिष शेलार म्हणाले, जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेत्यांमध्ये नाव असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अतिशय हीन आणि टवाळकीच्या भाषेत टीका करणे ही उबाठा सेनेची संस्कृती आहे. मराठी माणूस आणि महाराष्ट्र सुसंस्कृत म्हणून ओळखला जातो. त्यामुळे असभ्य आणि असंस्कृत बोलणाऱ्यांना महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने कधीही स्थान दिलेले नाही. ज्या भाषेत तुमचे राजकीय प्रवक्ते बोलत आहेत ती तुम्हाला मान्य आहे का, हा उद्धवजींना सवाल आहे असेही ते म्हणाले. कधी स्व. अहमद पटेल, कधी राहुल गांधी, कधी पवार, कधी ममता बॅनर्जी तर कधी केजरीवाल.. मुजर्यांची वरात म्हणजे संजय राऊत आणि उद्धवजींची फौज आहे असाही टोला आशिष शेलार यांनी लगावला.
