काँग्रेसच्या बळवंत वानखडेंचा उमेदवारी अर्ज दाखल.
अमरावती, दि. ३० मार्च :
नौटंकीबाज लोकांना आता घरी बसविण्याची वेळ आली आहे. सच्चा आणि प्रामाणिक मातीशी जुळलेला उमेदवार मिळाल्याने अमरावती जिल्ह्यातील नागरिकांमध्ये कमालीचा उत्साह असून हा उत्साह मतदानरुपी आशीर्वादात बदलवून बळवंत वानखडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांनी केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत यशोमती ठाकूर बोलत होत्या. बळवंत वानखडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडी व घटक पक्षाचे हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी व अफाट जनसमुदाय नेहरू मैदानावर उपस्थित झाला होता.
यावेळी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, भाजपा सरकारने अच्छे दिनच्या नादात दहा वर्षात देशातील कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, वंचित आणि शोषितांची घोर फसवणूक केली. आज अमरावती जिल्हा राणा दाम्पत्याने दहा वर्षे मागे आणून टाकलाय त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना, बेरोजगारांना आता न्याय देण्यासाठी शेतीमातीशी जुळलेला आपला हक्काचा माणूस महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांना निवडून आणण्याचे आवाहन सभेत केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी खा. अनंत गुढे, बबलू देशमुख, प्रदीप राऊत उपस्थित होते. सकाळी शहरातील महापुरुषांना अभिवादन करून संपूर्ण शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. बळवंत वानखडे यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या भव्य बाईक रॅली मुळे अमरावती शहरात उत्साह संचारला होता. त्यानंतर झालेल्या सभेला उपस्थित असलेल्या अफाट गर्दीने विरोधकांचे धाबे दणाणले.यावेळी विविध पक्षाच्या वरिष्ठ तसेच स्थानिक नेत्यांनी मनोगत व्यक्त करून विरोधकांना धारेवर धरले. सभेचे संचालन हरिभाऊ मोहोड व प्रवीण मनोहर यांनी केले.
