सर्वसामान्यासाठी झटणारे नेतृत्व हरपले.
मुंबई, दि. २९ मार्च :
शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षीताई पाटील यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद व वेदनादायी आहे. मिनाक्षीताई पाटील यांनी जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष केला तसेच विधिमंडळातही आवाज उठविला. त्यांच्या निधनाने सर्वसामान्यासाठी झटणारे धडाडीचे नेतृत्व हरपले आहे, अशा शोकभावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.
मिनाक्षाताई पाटील या लढवय्या नेत्या होत्या. अलिबाग विधानसभा मतदार संघातून त्यांनी तीनवेळा विजय मिळवला होता. विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम पाहिले. राजकारणाचे बाळकडू त्यांना घरातून मिळाले होते, राजकारणात येण्याआधी त्यांनी पत्रकार म्हणूनही काम केले आहे. मिनाक्षीताई पाटील या एक अभ्यासू नेत्या होत्या तसेच एक उत्तम वक्त्या होत्या. त्यांचा दांडगा जनसंपर्क, मनमिळावू स्वभाव यामुळे सर्वच पक्षात त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले आहे.
मिनाक्षीताई पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे असे नाना पटोले म्हणाले.
