चार महिन्यात सरकार बदललेले असेल.
इंदापूर, दि. २३ मार्च;
कांद्याला, दुधाला भाव नाही, भाव आमदाराला आहे. आम्हाला अच्छे दिन नकोय. आम्हाला २०१४ च्या आधीचे दिवस हवे आहेत. अजित पवार गेल्याने झाडाचे पान देखील हलले नाही. एकनाथ शिंदे गेल्याने शिवसेना मजबूत झाली. जे महाविकास आघाडीला सोडून गेले त्यांना जनता जागा दाखवेल. आजही लोकांना वाटते की, शरद पवार कृषी मंत्री आहेत. या भारताचा आधार शरद पवारांच्या रूपाने बारामतीत आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
धमक्या द्यायच्या, पोलिसांचा वापर करायचा. आम्ही आयुष्यभर धमक्या देतच आलेलो आहोत. तुम्हाला धमक्या नवीन असतील, आम्ही धमक्या देतो सुद्धा आणि घेतो सुद्धा. धमक्या आवाज बदलून दिल्या जातात. तुम्ही बारामतीत धमक्या देत असाल तर तुम्हाला मुंबईत यायचं आहे, ठाण्यात यायचं आहे. ही मर्दांची सभा, नामर्द होते ते पळून गेले, तुम्ही तुमचा प्रचार करा आणि निवडून घेऊन दाखवा. बारामतीची लढाई ही महाराष्ट्राची लढाई आहे. आताही प्रचाराची गरज नाही. बारामतीचे गुजरात करू पाहत असाल तर इथे शिवसेनेचा झेंडा असेल. धमक्या देऊन मत मागतात त्यांनी विकास केला नाही असं हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस तुमच्या सगळ्यांचे नेते आहे. ते म्हणाले मी पुन्हा आलो आणि दोन दोन पक्ष फोडून आलो. काय हे क्वालिफिकेशन, लोक विकास करून येतात. मी त्यांना सांगतो चार महिन्यात सरकार बदललेले असेल. केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार नसेल. ईडी आणि सीबीआय आहेत. त्या काही दिवसांनी आमच्याकडे येणार आहेत. तुमचा पक्ष शिल्लक राहतो का ते बघा, असा टोला संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.
हर्षवर्धन पाटील यांना शांत झोप लागत असेल तर तुम्ही महाराष्ट्राच्या मातीतील माणूस म्हणायला लायक नाहीत. या देशात दोन लोकांना झोप लागते. त्यांना गुजरातला पाठवू तिथे त्यांना शांत झोप लागेल. नाहीतर जिथे केजरीवाल आणि सोरेन किंवा आम्ही जिथे राहिलो तिथं पाठवू त्यांना शांत झोप लागेल, असे संजय राऊत म्हणाले आहे.
