अजित पवारांना धक्का, बजरंग सोनवणे पवार गटात..
मपुणे, दि. २१ मार्च :-
अजित पवार गटाचे बीड जिल्ह्य़ातील नेते बजरंग बाप्पा सोनावणे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी बांध फुटलाय आणि पाणी वाहायला लागलंय, अनेक जण बाहेर पडतील असे सुचक वक्तव्य जयंत पाटील यांनी केले आहे
या पक्षप्रवेश सोहळ्यात जयंत पाटील म्हणाले की, पक्षात फुट पडली त्यावेळी बजरंग बाप्पा नेहमीच भेटत राहिले ते कधी तिकडे गेलेच नाही अशीच परिस्थिती आहे. मागच्या आठवड्यात आम्ही याच ठिकाणी आमदार निलेश लंके यांच्या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा घेतला होता. तो फक्त पुस्तक प्रकाशनाचा सोहळा होता. निलेश लंकेंनी बांध फोडलेला आहे, आता पाणी वाहायला सुरुवात झाली आहे. हळुहळु अनेक बाहेर फोडायला उत्सुक आहेत. त्यामुळे बजरंग बाप्पाच्या प्रवेशाला महत्त्व आहे असे त्यांनी सांगितले
बीडकर प्रचंड उत्साहाने या ठिकाणी उपस्थित होते. बजरंग बाप्पांनी मागची लोकसभा लढवली आणि चांगली मते घेतली. लोकांशी सामान्य भाषेत संवाद साधण्याचा चांगला प्रयत्न केला पण यश आले नाही. आज या देशातील शेतकरी नाराज आहे, महागाई वाढली आहे, बेकारी वाढली आहे, जनता त्रागा करत आहे आणि त्यामुळे देशात आता धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी परिस्थिती आहे असे ते म्हणाले.
इलेक्टोरल बाँड्सचे प्रकरण सध्या प्रचंड गाजत आहे. स्वच्छ मार्गाने भ्रष्टाचार कसा करायचा असा पायंडा घालण्याचा प्रकार या इलेक्टोरल बाँड्सच्या माध्यमातून करण्यात आली. कोणत्या पक्षाला किती बाँड्स मिळवण्याचा प्रयत्न होत होता पण सुप्रीम कोर्टाने तो प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही असे म्हणत त्यांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले.
बजरंग बाप्पा यांचे पक्षात स्वागत करताना ते म्हणाले की, मला खात्री आहे की बीड जिल्हा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ताकदीने लढेल. पवारांकडे देशातील राज्यातील जनता मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. आदरणीय पवार साहेबही प्रत्येक माणसाला या प्रवासात जोडुन घेत आहे. ज्यात तरुणांची संख्या जास्त आहे. मला खात्री आहे की आपण एकजुटीने या देशातील परिस्थिती बदलून टाकू.
