…म्हणून शिवतारे, हर्षवर्धन अजितदादांचे शत्रुत्व !
मुंबई, दि. २० मार्च :
विजय शिवतारे आणि अजित पवार यांचे व्यक्तीगत काही नाही. २०१९ मध्ये मित्रपक्ष सासवड विधानसभा मतदारसंघातील संजय जगताप यांची कॉंग्रेसची जागा होती. कॉंग्रेसला विजयी करण्यासाठी आणि शरद पवारांबद्दल विजय शिवतारे यांनी जे उद्गार काढले ते अजित पवारांना पटले नाही. त्या कारणासाठीच अजित पवारांनी विडा उचलला आणि असे शत्रूत्व निर्माण झाले,असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे स्पष्ट केले.
तटकरे पुढे म्हणाले की, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी, शरद पवार यांचा अभिमान टिकवण्यासाठी आणि आघाडीचा धर्म पाळण्यासाठी शत्रुत्व पत्करले. आज जे टिकाटिपण्णी करत आहेत तशी वस्तुस्थिती नाही. विजय शिवतारे जे बोलत आहेत त्यांचा तो राग आहे मात्र काही लोकांना बरं वाटतंय. आता ही स्क्रीप्ट कुणाची आहे याचा शोध आम्ही घेत आहोत. मात्र मुख्यमंत्री आमच्या महायुतीचे नेते असून ते योग्य ती भूमिका घेतील असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.
हर्षवर्धन पाटलांच्याबाबतीत काय घडले की २०१४ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढलो. त्यामुळे दत्ता भरणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर अधिकृत निवडून आले. २०१९ मध्ये तीच परिस्थिती निर्माण झाली असे सांगतानाच पक्ष टिकवण्यासाठी अजित पवारांनी केलेली मेहनत आणि आज जो पक्ष उभा आहे त्यात अजित पवार व्यतिरिक्त कुणाचे योगदान नाही म्हणूनच इतके आमदार निवडून आणता आले आणि २०१९ मध्ये आमदार निवडून आणण्यामध्ये अजित पवारांचा सिंहाचा वाटा होता असा दावाही सुनिल तटकरे यांनी केला.
