20240314_183345

चांदवड, दि. १४ मार्च :
ज्यांना शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव नाही, त्यांचे दुःख समजत नाही तो शेतकऱ्यांना मदत काय करणार? असा सवाल उपस्थित करत काँग्रेस सरकारचे व आपले दरवाजे सदैव शेतकरी व सर्वसामान्यांसाठी खुले असतील व इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांना जीएसटीमधून वगळणार, पीक वीमा योजनेची पुनर्रचना करणार असे खासदार राहुल गांधी यांनी सांगितले.

भारत जोडो यात्रेदरम्यान चांदवड येथे शेतकरी मेळाव्याला राहुल गांधी संबोधित करत होते. राहुल गांधी पुढे म्हणाले की, देशात आज शेतकरी समस्या, बेरोजगारी, महागाई, भागिदारी हे मुळे मुद्दे आहेत पण जनतेच्या या मुद्द्यांपासून लक्ष दुसरीकडे वळवले जात आहे. पिक विमा योजनेचा फायदा केवळ कंपन्यांना होतो, शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्यांना मदत मिळत नाही हे चित्र बदलण्याची गरज आहे, काँग्रेसचे सरकार आल्यानंतर पिक विमा योजनेची पुनर्रचना केली जाईल.

आयात-निर्यात धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसणार नाही याची काळजी घेतली जाईल. शेतकऱ्यांवर जीएसटी लावलेला आहे त्याचा काँग्रेस सरकार विचार करुन शेततकऱ्यांना जीएसटीतून वगळण्याचा प्रयत्न करेल. मुठभर उद्योगपतींचे कर्ज माफ होत असेल तर शेतकऱ्यांचेही कर्ज माफ झाले पाहिजे व काँग्रेस सरकार ते करेल. सीमेवरील जवान व शेतकरी यांच्याशिवाय देश चालू शकत नाही म्हणून शेतकऱ्यांचे आवाज ऐकणारे काँग्रेसचे सरकार असेल असे राहुल गांधी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *