महाराष्ट्रात ‘खोके-बोके’यांचे भ्रष्ट सरकार..
नंदुरबार, दि. १२ मार्च :
भाजपा ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करते त्यांनाच सत्तेत सहभागी करुन घेते, जलसंपदा विभागात घोटाळा झाला असे आरोप केले व त्यानांच सत्तेत आणून बसवले. आज महाराष्ट्रात खोके व बोके यांचे भ्रष्ट सरकार आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
नंदूरबार येथील आदिवासी संमेलनात बोलताना नाना पटोले म्हणाले की, १२ मार्च रोजी महात्मा गांधी यांनी जुलमी ब्रिटीश सत्तेविरोधात दांडी यात्रा काढली होती तसेच महाराष्ट्राचा मंगल कलश आणणारे यशवंतराव चव्हाण यांची जयंतीही आजच आहे आणि आदिवासींच्या होळीचा पहिला दिवस आहे, अशा या मंगलमय वातावरणात राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेने छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या पावन भूमीत आगमन झाले आहे.
भाजपा सरकार आदिवासींवर अत्याचार करत आहे, महिलांवर अत्याचार करत आहे. मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार केला पण भाजपा सरकार डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहे. जे सरकार महिलांवर अत्याचार करते त्यांची सत्ता रहात नाही हा इतिहास आहे. नंदूरबारमधून जेव्हा जेव्हा काँग्रेसचा खासदार निवडून येतो तेव्हा केंद्रात काँग्रेसचे सरकार येते. यावेळी नंदूरबारचा खासदार काँग्रेसचाच होईल व केंद्रात काँग्रेसची सत्ता येईल.
यावेळी विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, नंदूरबार हा काँग्रेस विचाराचा जिल्हा आहे, इंदिराजी गांधी, राजीवजी गांधी, सोनियाजी गांधी लोकसभेच्या प्रचाराचा नारळ नंदुबारमधूनच फोडत. नंदूरबारला मोठा इतिहासही आहे, १९४२ च्या आंदोलनात पहिले बलिदान नंदूरबार जिल्ह्याने दिले आहे. राहुलजी गांधी यांनी आधी ४००० किमी पदयात्रा काढली व आता भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून न्याय देण्याचा संकल्प घेऊन ते मणिपूरपासून मुंबईपर्यंत निघाले आहेत. आपल्याला आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात व केंद्रात काँग्रेसची सत्ता आणायची आहे, असे आवाहन थोरात यांनी केले.
