महायुतीला विजयी करण्याचा RPI चा संकल्प.
मुंबई दि. २ फेब्रुवारी-
रिपब्लिकन पक्ष हा राष्ट्रीय स्तरावर एन.डी.ए.चा आणि महाराष्ट्रात महायुतीचा अविभाज्य घटक पक्ष आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे 45 खासदार निवडुन आणण्याचा रिपब्लिकन पक्षाचा संकल्प आहे.आगामी काळातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा संकल्प रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी करावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
चेंबुर येथील चंदन लॉन येथे रिपब्लिकन पक्षाचा दक्षिण मध्य मुंबईच्या वतीने आयोजित संकल्प मेळाव्यात रामदास आठवले बोलत होते.
रिपब्लिकन पक्ष देशभर वाढत आहे. महाराष्ट्र आणि मुंबई रिपाइंचा बालेकिल्ला आहे. 1992 च्या महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे 12 नगरसेवक निवडुन आले होते. रिपाइंला महापौरपद ही त्यावेळी मिळाले होते. या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप महायुतीमधुन 25 जागा लढवण्याची तयारी रिपब्लिकन पक्ष करित आहे. त्यातुन किमान 15 जागा तरी निवडुन आणण्याचा आणि मुंबईचे उपमहापौरपद मिळविण्याचा रिपाइंचा संकल्प आहे. रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात कामाला लागावे. जनतेत मिसळून जनतेचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.
रिपाइंच्या या संकल्प मेळाव्यास महायुतीमधील भाजप आणि शिवसेने च्या नेत्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आणि स्थानिक खासदार राहुल शेवाळे, भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आदींना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र महायुतीमधील एकही नेता रिपाइं च्या संकल्प मेळाव्यास उपस्थित राहिले नसल्याची या मेळाव्यात मोठी चर्चा झाली. याबाबत रिपाइं नेत्यांनी नाराजी ही व्यक्त केली.
