अशोक चव्हाणांचा काँग्रेसला ‘रामराम’..
मुंबई, दि. १२ फेब्रुवारी:
काँग्रेस पक्षाच्या मागील शुक्लकाष्ट काही जात जात नाही असे दिसत आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत जनतेपर्यंत जाऊन पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असताना पक्षातील एक एक नेता पक्ष सोडून डात आहे. आज महाराष्ट्रातील एक महत्वाचे नेते माजी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष पद भूषविलेले नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडला.
काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना असे म्हटले की,”आज मी विधानसभा अध्यक्षांना भेटून काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. काँग्रेस कार्यसमिती, पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व आणि विधीमंडळ काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये असताना मी प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले. कोणाबद्दल मी तक्रार करणार नाही. वैयक्तिक कोणाबद्दलही माझ्या मनात वेगळी भावना नाही. पुढील राजकीय दिशेबाबत अद्याप मी काहीही निर्णय घेतलेला नाही. याबाबत विचार करून एक-दोन दिवसात माझी भूमिका स्पष्ट करेल.”
अशोक चव्हाण काँग्रेस पक्ष सोडणार अशा बातम्या मागील वर्षभरापासून येत होत्या पण त्या पुन्हा हवेतच विरून जायच्या आज अचानक अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याने महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात दिवसभर चर्चा होती. अशोकच चव्हाण भाजपात जातील असे सांगितले जात आहे. दोन दिवसात काय निर्णय घेतील ते समजेलच पण काँग्रेस पक्षाने एक मोठा व महत्वाचा नेता गमावला आहे.
