सरकार बरखास्त करण्यासारखी परिस्थिती नाही.
सरकार बरखास्त करण्यासारखी परिस्थिती नाही.
मुंबई दि. ११ फेब्रुवारी –
विरोधक राज्यपालांना सरकार बरखास्त करण्यासाठी भेटायला गेले होते. ज्या घटना घडल्या त्याचे मी समर्थन करणार नाही. परंतु राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली असे भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. आपण २६ /११ ची घटना पाहिली आणि अनुभवली आहे. सरकारे येतात जातात मात्र जनतेचे, समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही काम करत आहोत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.
माझ्या राजकीय आयुष्यात तीन वेळा पंजावर निवडून आलो आहे असे सांगतानाच सत्तेत जास्त काळ आमचा गेला आहे. महायुतीत असलो तरी आम्ही शिव – शाहू – फुले – आंबेडकर यांची विचारधारा सोडलेली नाही. अनेक जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने मुंबई आणि राज्यात राहत आहेत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. वारेमाप आश्वासन देणे ही राष्ट्रवादीची कालही – आजही भूमिका नाही असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
मुंबईत आमच्या मंत्र्यांना सांगून त्यांच्याशी चर्चा करून अनेक विकास कामे पूर्ण केली जात आहेत. याचा फायदा मुंबईकरांना झाला पाहिजे. बांधकाम कामगाराचे एक महामंडळ काढले होते. त्याचे हसन मुश्रीफ यांनी अनेक वर्षे प्रतिनिधीत्व केले. असंघटित कामगारांसाठीही आपल्याला काम करायचे आहे असा शब्दही अजित पवार यांनी दिला.
विरोधी पक्षात राहून कामे होत नाहीत. विरोधाला विरोध करावा लागतो, आंदोलने करावी लागतात. त्यातून प्रश्न तडीला जात नाही. त्यामुळे निधी देण्याकरिता किंवा कामे करण्यासाठी सत्तेत असावे लागते असेही अजित पवार म्हणाले.
