मुंबईबाहेरील रुग्णांना स्वतंत्र शुल्क आकारणीस विरोध..
मुंबई, दि. २ फेब्रुवारी:
बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यांतील रुग्णांना सुध्दा उत्तम आरोग्य सेवा पुरविल्या जातात. मुंबईकरांकडून प्राप्त होणाऱ्या करातून बृहन्मुंबई महानगरपालिका आरोग्य सेवेवर मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. महाराष्ट्राबाहेरुन उपचारासाठी येणाऱ्या लोकांसाठी स्वतंत्र शुल्क रचना लागू करण्याची बाब आक्षेपार्ह व अन्यायकारक आहे. भाजपाचा याला विरोध राहिल, अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी दिली.
मुंबई महापालिका अर्थसंकल्पावर बोलताना ते म्हणाले की, मुंबई महापालिकेचा सादर झालेला अर्थसंकल्प काही गोष्टींचे समाधान व्यक्त करावा असा आहे पण काही बाबी अजून असायला हव्या होत्या, अशा स्वरूपातील आहे. गेल्या २५ वर्षात पेंग्वीन सेनेने जो चमकोगिरीचा अजेंडा सुरु केला होता त्यातून महापालिका आता बाहेर पडत आहे असे आशावादी चित्र पहायला मिळत आहे. पेग, पेग्वीन आणि पार्टी” कल्चरकडून गरिबांच्या सेवेकडे, मुंबईकरांना चांगल्या सुविधा देण्याकडे पालिकेचा कल दिसत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सर्व रुग्णांना आरोग्यसेवा सवलतीच्या दरात देण्यात येतात मात्र अनुसूचीवर नसलेली औषधे व आधुनिक स्वरुपांची औषधे व रोपण साहित्य रुग्णांना बाहेरुन खरेदी करावी लागतात. यासाठी “मुख्यमंत्री शून्य प्रिस्क्रिप्शन धोरण” राबविण्यात येणार आहे ही बाब स्वागतार्ह आहे.महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना / आयुष्यमान भारत आरोग्य योजना व गरीब रुग्ण सहाय्यता निधीमधून खरेदी करण्यात येणाऱ्या गोष्टींसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत दर परिपत्रक प्रसारीत करण्यात येणार आहे. त्यासाठी २०२४-२५ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ५०० कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे. मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी ७ स्मशानभूमी पीएनजी गॅस मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आणि ९ स्मशानभूमींमध्ये लाकडांऐवजी ब्रिकेटचा वापर करता यावा यासाठी तब्बल 1716.85 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सफाई कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या आश्रय योजनेसाठी गतवर्षी 400 कोटींची तरतूद होती यावर्षी त्यामध्ये वाढ करून 1055 कोटी एवढी घसघशीत रक्कम प्रस्तावित करण्यात आली आहे. धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसाह्य योजनेत गतवर्षी 111.83 कोटी तरतूद होती ती यावर्षी वाढवून 507.98 कोटी एवढी करण्यात आली आहे. या तरतुदी स्वागतार्ह आहेत, असे शेलार म्हणाले..
