सर्व घटकांची निराशा करणारा अर्थसंकल्प..
संगमनेर दि. २ फेब्रुवारी;
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सादर केलेल्या शेवटच्या केंद्रीय अर्थसंकल्पात काहीही ठोस नाही. संपूर्ण मध्यमवर्ग महागाईने होरपळतो आहे, अशावेळी त्यांना दिलासा देण्याची गरज आहे परंतु महागाईवर कोणतेही धोरण अथवा ठोस उपाययोजना केलेली नाही. शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय व सामान्य गोरगरिब जनतेसाठी कोणतीही मदत नसणारा सर्व घटकांची पूर्णपणे निराशा करणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.
अर्थसंकल्पावर बोलताना बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर शेअर बाजारामधील घडामोडी अवलंबून असतात मात्र यावेळेस शेअर बाजार पूर्णपणे ठप्प आहे. शेतकऱ्यांना फार मोठी मदत केल्याचा डांगोरा पिटला जात आहे मात्र दुर्दैवाने शेतकऱ्यांनाही या अर्थसंकल्पातून कोणतीही मदत मिळालेली नाही. महागाई प्रचंड वाढलेली ती कमी करण्याबाबत काही ठोस धोरण नाही, बेरोजगारीसंदर्भातही केंद्र सरकारने काहीही पावले उचललेली नाहीत. राज्यांच्या हक्काचा निधी केंद्र सरकारकडे थकलेला आहे, त्यातून राज्यांना दिलासा मिळाला नाही यामुळे राज्यांना प्रगती करणे सुद्धा अवघड जाणार आहे. या अर्थसंकल्पावर कोणताही घटक समाधानी नसून संपूर्ण अर्थसंकल्पच निराशजनक आहे, सत्ताधारी पक्ष मीडियाच्या साह्याने हरलेल्या डावाचा जयजयकार करतील मात्र तो खरा जयजयकार नसेल, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.
