निराशाजनक, नकारात्मक आणि नाविन्य नसलेला अर्थसंकल्प .
मुंबई, दि. १ फेब्रुवारी :-
निराशाजनक, नकारात्मक आणि नाविन्य नसलेला हा अर्थसंकल्प आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर केली आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेले अंतरिम बजेट ही निव्वळ धूळफेक आहे. देशातील बेरोजगारी आणि महागाई कमी करण्यासाठी कोणतीही उपाययोजना या अर्थसंकल्पात नाही. या बजेट मध्ये देशातील दलित आणि आदिवासींसाठी नक्की काय आहे असा प्रश्न मला पडतो.
पुढे बोलताना ते म्हणाले की, या अर्थसंकल्पात सर्वाधिक वेळा पंतप्रधानांचा उल्लेख केला गेला. प्राप्तिकर स्लॅबमध्ये देखील कोणतेही बदल या अर्थसंकल्पात केले गेलेले नाहीत. देशाच्या अर्थव्यवस्थेची खरी परिस्थिती समोर येऊ नये म्हणूनच बहुधा यावर्षी पहिल्यांदाच देशाचा आर्थिक पाहणी अहवाल मांडला गेलेला नाही असाही टोला जयंत पाटील यांनी लगावला.
