जालना-मुंबई वंदे भारत रेल्वे सुरू.
जालना-मुंबई वंदे भारत रेल्वे सुरू.
मुंबई दि. ३१ डिसेंबर:
जालना- मुंबई ही वंदे भारत रेल्वे सेवा सुरु झाली असून छत्रपती शिवाजी टर्मिनल स्थानकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रेल्वेचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.
राज्यात रेल्वेने १ लाख ७ हजार कोटींची कामं हाती घेतली आहेत. आज हे वर्ष संपत असताना राज्याला सातवी वंदे भारत ट्रेन मिळाली आहे याचा आम्हा सगळ्यांना आनंद आहे. पंतप्रधानांनी एकदा ठरवलं की तो प्रकल्प किंवा कार्यक्रम टाईम बाउंड पद्धतीनं पूर्ण होतोच असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
प्रारंभी मध्य रेल्वेचे अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक चित्तरंजन स्वैन यांनी प्रारंभी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.जालना –मुंबई वंदे भारत ट्रेनचे आगमन झाले तेव्हा मुख्यमंत्री भाषण करत होते. उतरलेल्या प्रवाशांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत करताच या प्रवाशांनी सुद्धा टाळ्या वाजवून दाद दिली. त्यानंतर मुख्यमंत्री स्वतः ट्रेनमध्ये चढले आणि त्यांनी प्रवाशांना आणि उपस्थित विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प तसेच मिठाई दिली. या ट्रेनमधल्या सोयी आणि सुविधांविषयी प्रवाशांकडून जाणून घेतले. प्रवाशांचे अनुभव उत्सुकतेने ऐकत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासमवेत रेल्वेमध्ये तब्बल अर्धा तास दिला. प्रवाशांनी देखील यावेळी समाधान व्यक्त केले.
आता महाराष्ट्रात जालना ते मुंबई, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते शिर्डी, मुंबई ते मडगाव, मुंबई सेन्ट्रल ते गांधीनगर, नागपूर ते इंदौर, नागपूर ते बिलासपुर अशा सात ट्रेन्स धावतील.
