दबावामुळे निरगुडे आयोगाचे राजीनामे ?
दबावामुळे निरगुडे आयोगाचे राजीनामे ?
नागपूर, दि. १२ डिसेंबर:
राज्यातील निरगुडे मागासवर्गीय आयोगावर शिंदे आयोगाने दिलेली माहितीच खरी माना असा दबाव होता अशी माहिती आहे. या दबावामुळेच निरगुडे आयोगातील सदस्यांनी आधी राजीनामे दिले तर आता स्वतः आयोगाचे अध्यक्ष निरगुडे यांनी राजीनामा दिला आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला आहे.
सरकारवर तोफ डागत नाना पटोले म्हणाले की, निरगुडे मागासवर्गीय आयोग असतानाही सरकारने शिंदे आयोग कोणत्या कारणाने बसवला, त्याचे उत्तर द्यावे लागले. मागासवर्गीय आयोगाचा उल्लेख मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री करतच नाहीत. मुख्यमंत्री फक्त शिंदे आयोगाचाच उल्लेख करतात. निरगुडे आयोगाचा उल्लेख ते का करत नाहीत? मागासवर्गीय आयोग असतानाही शिंदे आयोग कशासाठी? फडणवीस सरकारने गायकवाड आयोग नेमला होता, त्यावर सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले होते तरिसुद्धा आताच्या सरकारने शिंदे आयोग नेमला. सरकार जाणीवपूर्वक आरक्षणाचा वाद चिघळून मराठा ओबीसी वाद वाढवत आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
