दिल्लीश्वरांना कांद्याची निर्यातबंदी उठवावीच लागेल..
दिल्लीश्वरांना कांद्याची निर्यातबंदी उठवावीच लागेल..
नाशिक, दि. ११ डिसेंबर :
कांदा हे जिरायती शेतकऱ्यांचं पीक आहे. कांदा असं पीक आहे की, त्यामधून दोन पैसे मिळतात. त्यासाठीच शेतकरी कष्ट करतात. पण केंद्रात बसलेल्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या भावनांची किंमत नाही. देशाच्या अर्थव्यवस्थेत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंद आहे. केंद्र सरकारला शेतकऱ्यांबद्दल आस्था राहिलेली नाही, शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारने कांदा निर्यातबंदी उठवलीच पाहिजे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले. चांदवडच्या दिशेने येत असताना जागोजागी शेतकरी शरद पवार यांना भेटून निवेदनं देत होते. शरद पवार यांनी या प्रकरणात मध्यस्थी करावी आणि कांदा निर्यात बंदीचा निर्णय केंद्र सरकारला मागे घ्यायला लावावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.
शरद पवार म्हणाले की, कांद्याच्या संदर्भात केंद्राने निर्यात बंदीचा निर्णय घेतला. यामुळे आपणास रस्त्यावर उतरावे लागले. आजच्या आंदोलनामुळे दिल्ली सरकारची झोप उडाली असेल. परंतु रास्ता रोको केल्याशिवाय दिल्लीला कळत नाही. आता आंदोलनानंतर दिल्लीश्वरांना कांद्याची निर्यातबंदी उठवावीच लागणार आहे. रास्ता रोकोतून केंद्र सरकारला आज संदेश दिला. आता उद्या दिल्लीत जाऊन संसदेत शेतकऱ्यांची व्यथा मांडणार असल्याचे शरद पवार यांनी म्हटले.
कांदा हे लहान व जिरायती शेतकऱ्यांचं पीक आहे. पण दुर्दैवाने ज्यांच्या हातात देशाचे धोरण ठरवायचे अधिकार आहेत, त्यांच्यादृष्टीने शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळावी, ही भावना नाही. केंद्र सरकारमध्ये बसलेल्या लोकांना ही जाण नसेल तर शेतकरी उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दुर्दशेसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले. हा एक निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करणारा आहे. त्यामुळे कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली पाहिजे, अशी मागणी शरद पवार यांनी केली.
मागे मनमाडला आलो होतो, तेव्हा मला काही शेतकऱ्यांनी सांगितले की, कांदा संदर्भात काही निर्णय केंद्र सरकार घेत आहे. त्यामुळे मी कार्यक्रम थांबवून तत्काळ दिल्लीला गेलो. त्यावेळी, भाजपचे लोके कांद्याच्या माळ गळ्यात घालून आले होते. याबाबत अध्यक्षांना विचारल्यावर कांद्याचे भाव खूप वाढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कांद्याचे दर कमी करता येणार नाही का? असे मला अध्यक्षांनी विचारले. त्यावर, दोन पैसे शेतकऱ्यांना मिळत असतील तर मिळू द्या असे मी त्यांना सांगितले, असल्याच शरद पवार म्हणाले.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदान अजून दिलेले नाही. हे अनुदान देण्याची प्रक्रिया लवकर राबवा. शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी द्या, अशी मागणी शरद पवार यांनी केली. तसेच नाशिककरांना शरद जोशी यांच्या आंदोलनाची आठवण करुन दिली. शरद जोशी यांनी नाशिक जिल्ह्यातून शेतकऱ्यांची सामूदायिक शक्ती उभी केली होती. त्यांनी शेतकऱ्यांची ताकद सरकारला दाखवली. तसाच इतिहास आता घडवायचा आहे. नाशिककरांना पुन्हा सामूदायिक शक्ती दाखवावी लागणार आहे असेही शरद पवार म्हणाले.
