अजित पवारांचा ‘तो’ विचार मान्य नव्हता…
अजित पवारांचा ‘तो’ विचार मान्य नव्हता…
पुणे, दि. ३ डिसेंबर;
प्रफुल पटेल यांना पराभूत होऊनही मंत्रिपंद दिलं, त्याची खंत आहे. लोक पक्ष का सोडून जातात यावर प्रफुल पटेलांनी एक प्रकरण त्यात लिहावं. तसंच ईडीच्या त्यांच्यावरील कारवाईवरही त्यांनी प्रकरण त्या पुस्तकार लिहावं असा सल्लाही पवार साहेब यांनी दिला. ईडीने प्रफुल पटेल यांच्या घराचा ताबा घेतला होता. त्यावेळी काय-काय झालं त्याबद्दलही त्यांनी लिहावं. ते वाचून आमच्याही ज्ञानात भर पडेल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
शरद पवार म्हणाले की, पक्षाचा अध्यक्ष मी होतो, सामूहिक निर्णय झाला होता. सामूहिक निर्णयाच्या बरोबर काही वेगळं करण्याचे कारण नव्हतं. आमची स्वच्छ भूमिका होती की भाजपसोबत जायचे नाही. कालच्या भाषणात असं एक सांगितलं गेलं की अनिल देशमुख यांना देखील भाजपसोबत जायचं होतं. पण देशमुखांनी काल लगेच जाहीर केलं की असं मत मी कधी मांडलं नाही. एवढच नाही तर हा रस्ता आपला नाही हे देखील त्यांनी त्यावेळी सांगितले होते. ते असं सांगत असताना देखील त्यांच्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर करणे योग्य नाही.
माझ्याकडून त्यांना कधी बोलवण्यात आले नव्हते. मी पक्षाचा अध्यक्ष आहे त्यामुळे पक्षातील कोणत्याही सदस्याला माझ्याशी संवाद ठेवण्याचा अधिकार आहे. त्यावेळी अनेक लोक लपवत होते त्यांनी काही मागण्या केल्या होत्या. त्याची चर्चा झाली होती. ते ज्या रस्ताने जाण्याचा विचार करत होते. तो विचार आम्हा लोकांना मान्य नव्हता असे शरद पवार यांनी सांगितले.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत लोकांना आम्ही मतं मागितली होती ती मतं भाजपसोबत जाण्यासाठी नव्हती. ती एका विशिष्ट कार्यक्रमासाठी होती. एवढंच नाही तर भाजप आणि त्यांच्या विचारधारेविरोधात होती. आमच्या भूमिकेला लोकांचा पाठिंबा होता म्हणून आमचे लोक निवडून आले. त्यामुळे जो कार्यक्रम मांडला, भूमिका मांडली त्याच्याविरुद्ध काही सूचविले असेल तर ती लोकांशी फसवणूक आहे. त्यामुळे ते करणे योग्य नाही अशी भूमिका माझ्यासह अनेक सदस्यांची होती, असे शरद पवार यांनी सांगितले.
पक्ष सोडणारे पुन्हा विधानसभेत दिसत नाहीत याची पुन्हा एकदा आठवण करुन दिली. त्याचबरोबर माझ्याबरोबर किती आमदार आहेत, ते आज सांगणार नाही. नरेंद्र मोदी यांनी भर सभेत सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला होता. मोदींनी सिंचन घोटाळ्याचे हे आरोप नेमके कुणावर केले ते तुम्हीच शोधा, असा टोलाही शरद पवार यांनी मारला.
