मराठा-ओबीसी वाद सरकार प्रायोजित..
मराठा-ओबीसी वाद सरकार प्रायोजित..
मुंबई, दि. २४ नोव्हेंबर :
राज्यात मागील काही दिवसांपासून सुरु असलेला मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद जाणीवपूर्वक घडवून आणला जात आहे. भाजपाने मराठा, ओबीसी, धनगर समाजाला जी आश्वासने दिली ती पूर्ण करावीत. कोणाच्या तोंडचा घास हिसावून घेणार नाही हे सरकार म्हणत आहे तर सरकार नेमके काय करणार हे जनतेसमोर स्पष्ट करावे. पण सरकारची भूमिकाच स्पष्ट नाही. दोन्ही समाजात सुरु असलेला वाद हा सरकार प्रायोजित असून आरक्षणावरुन सुरु असलेला हा धुमाकुळ सरकारने थांबवावा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यात बेरोजगारी, महागाई व शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे आहेत पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही. सरकारला शेतकरी, बेरोजगार तरुण, सर्वसामान्य जनतेच्या भावना कळत नाही पण जनतेला भेडसावत असलेले मुळ प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे आहेत. कोण काय बोलतो हे काँग्रेस व महाराष्ट्रातील जनतेसाठी महत्वाचे नाही व त्यात कोणाला स्वारस्य नाही. भाजपा हा आरक्षण विरोधी पक्ष असून देशाचे पंतप्रधानच गरिबी ही जात असल्याचे सांगून आरक्षण संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. आरक्षणप्रश्नावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट असून जातनिहाय जनगणना केल्यास मराठा, ओबीसी, धनगर समाजासह सर्व समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न सुटू शकतात. काँग्रेस सत्तेत आल्यास तसा निर्णय घेतला जाईल असे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे व राहुल गांधी यांनी आधीच स्पष्ट केले आहे.
