जायकवाडीत पाणी सोडण्याचा व मराठा आंदोलनाचा काय संबंध?
जायकवाडीत पाणी सोडण्याचा व मराठा आंदोलनाचा काय संबंध?
नांदेड, दि. २४ नोव्हेंबर ;
मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यामध्ये सुरु आंदोलनामुळे तूर्तास जायकवाडीत पाणी न सोडण्याबाबत गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने जलसंपदा विभागाला पत्र लिहिल्याची बातमी धक्कादायक आहे. उर्ध्व भागातून जायकवाडीत पाणी सोडण्याचा आणि मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा काय संबंध आहे? उगाच मराठा आंदोलनाला बदनाम करू नका अन् पाणी सोडण्याचे टाळू नका असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सरकारला सुनावले.
अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, मराठा आरक्षण आंदोलनाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा हा डाव आहे. पाटबंधारे विभागाचे पत्र म्हणजे पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या मराठवाड्यातील नागरिकांना मूर्ख बनविण्याचा प्रयत्न आहे. सदरहू पत्र कोणत्या कारणांमुळे लिहिले गेले, याचा राज्य सरकारने तातडीने खुलासा करावा.
उत्तर महाराष्ट्राच्या धरणांमधून जायकवाडीत ८.६ टीएमसी पाणी सोडण्याच्या ३० ऑक्टोबर २०२३ रोजीच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे मराठवाड्यातील तीव्र पाणी टंचाई व शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता राज्य सरकारने राजकीय दबावाला बळी न पडता मराठवाड्याच्या हक्काचे पाणी विनाविलंब सोडावे, अशी आग्रही मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.
