दलित आणि आदिवासींचा शत्रू ‘काँग्रेस’ !
दलित आणि आदिवासींचा शत्रू ‘काँग्रेस’ !
पांढुर्णा (मध्य प्रदेश), दि. १६ नोव्हेंबर;
काँग्रेसने नेहमीच दलित आणि आदिवासी समाजाचा अपमान केला आहे. दलित आणि आदिवासी समाज हा काँग्रेससाठी फक्त व्होट बँक आहे. काँग्रेसच्या प्रदीर्घ काळातील कुशासनामुळे दलित, आदिवासी, वंचित, शोषित, मागासलेले लोक आजही गरिबी आणि दु:खात जगत आहेत. गेली अनेक दशके ‘गरिबी हटाव’चा नारा देणाऱ्या काँग्रेसने सत्तेत असताना नेहमीच मागास समाजाचे शोषण केले. दलित, आदिवासी आणि मागासलेल्या समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणाला फक्त काँग्रेसच दोषी आणि जबाबदार आहे, असा आरोप उपमुख्यमंत्री दावेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
मध्य प्रदेशातील पांढुर्णा विधानसभा मतदारसंघात आयोजित जाहीर सभेमध्ये फडणवीस बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी समाजाच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी 24 हजार कोटींची कल्याणकारी योजना जाहीर केली आहे.
अनेक दशकं विकासापासून उपेक्षित समाजातील मागास घटकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 11 हजार कोटींची पीएम विश्वकर्मा योजना देखील सुरू केली आहे.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारने मध्य प्रदेशातील आदिवासी समाजाचा अभिमान वाढवण्यासाठी, त्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी, विकसित आणि समृद्ध करण्यासाठी तसेच त्यांना मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी काम केले. आदिवासी समाजाचा समृद्ध वारसा, संस्कृती, कला आणि इतिहास ही भारताची खरी ओळख आहे.
हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला ध्वस्त करणारे कमलनाथ पुन्हा कधीही मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. जाहीर सभेमध्ये उसळलेल्या जनसमुदायाचा जोश, जल्लोष आणि उत्साह पाहता मला खात्री आहे की, मध्य प्रदेशमध्ये भाजपाच पुन्हा प्रचंड बहुमताने आपले सरकार स्थापन करेल.
