बीडमधील हल्ले ठरवून केले होते का?
बीडमधील हल्ले ठरवून केले होते का?
मुंबई, दि. ७ नोव्हेंबर
बीडमध्ये जसे हल्ले झाले तसे महाराष्ट्रात आजपर्यंत कधीच झाले नाहीत. पोलिसांनीही यामध्ये कोणताच हस्तक्षेप केला नाही. झालेली घटना अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे, त्याचे आम्ही कधीच समर्थन करणार नाही, त्याचा मी निषेधच करतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुढे म्हणाले की, बीडमध्ये हल्ले होण्यापूर्वी सरकारी इंटिलिजेन्स यंत्रणा काय करत होती? यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप का केला नाही ? मग ते हल्ले ठरवून झाले होते का? मी पोलिसांना फोन करीत होतो मात्र पोलीस अधिकार्यांनी माझा फोन घेतला नाही. यानंतर ज्यांच्यावर हल्ले झाले, त्यांनाही मी फोन केला असता ते म्हणाले, की त्यावेळेस पोलीस त्याठिकाणी नव्हते, हा गंभीर प्रकार आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना ते म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात सरकार उदासीन आहे. मुख्यमंत्री एक बोलताहेत, उपमुख्यमंत्री दुसरे, तर अर्थमंत्री तिसरेच बोलत आहेत,यावरुन दिसून येत आहे की, आरक्षणाबाबत सरकारचे एकमत नाही. सरकारने हा विषय गांभीर्याने घेवून तो लवकरात लवकर निकाली काढावा. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, ही आमची मागणी आहे. राष्ट्रवादी पक्ष मराठा आरक्षणाबाबत ठाम आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिले पाहिजे, ही आमची भूमिका आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
