नौटंकीबाज मविआ नेत्यांना जनताच धडा शिकविणार!
नौटंकीबाज मविआ नेत्यांना जनताच धडा शिकविणार!
नागपूर, दि. २१ ऑक्टोबर:
महाविकास आघाडीतील नेते कधीही लोकांमध्ये जाऊन त्यांना समजावून सांगून मते घेऊ शकत नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले व इतर नेते जनतेत संभ्रम पसरविण्याचे काम करतात. पण आता या नेत्यांची नौटंकी महाराष्ट्रातील जनतेला समजली असून त्यांना जनता धडा शिकविणारच, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
कंत्राटी भरतीचा निर्णय मविआच्या काळात उद्धव ठाकरेंनी घेतला होता, तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महायुती सरकारने बदलवून बेरोजगार युवकांना न्याय दिला आहे, असे ते म्हणाले.
प्रदेशाध्यक्षानी महाविकास आघाडीने कंत्राटी भरतीचे महापाप केल्याने मविआ नेत्यांनी माफी मागावी, असे आवाहन करीत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार नागपूर येथील व्हेरायटी चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. यावेळी संतप्त झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी मविआ नेत्यांच्या पोस्टरला जोडे-चपला हाणून निषेध केला.
आंदोलनानंतर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले, मविआच्या नेत्यांनी माफी मागावी यासाठी राज्यभरात भाजपाच्या सुमारे पाच लाखांहून अधिक कार्यकर्ते ठिकठिकाणी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलनासाठी करून एकत्र आले. कंत्राटी भरती रद्द केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे आभार व्यक्त करून महाराष्ट्रातील युवकांच्यावतीने महायुती सरकारचे अभिनंदन व्यक्त केले. महाविकास आघाडीचे नेते खोटारडेपणा करीत असून देवेंद्र फडणवीस किंवा महायुतीचे सरकार खोटे काम करीत नाहीत, असेही ते म्हणाले.
