कुठलाही धर्म चुकीच्या वृत्तीला समर्थन करत नाही..
कुठलाही धर्म चुकीच्या वृत्तीला समर्थन करत नाही..
पुणे, दि. १ ऑक्टोबर ;
कोणत्याही समाजातील कुठलाही धर्म चुकीच्या प्रकाराला आणि वृत्तीला समर्थन करत नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे भागवत वारकरी संमेलनात वारकऱ्यांना संबोधित करताना म्हटले आहे. या कार्यक्रम सोहळ्याचे अध्यक्ष हरिभक्त परायण दिनकर शास्त्री महाराज होते.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून साताऱ्याचे खासदार अमोल कोल्हे, श्रीनिवास पाटील, माजी आमदार विलास लांडे, सोहळ्याचे अध्यक्ष हरिभक्त परायण दिनकर शास्त्री महाराज, विकास गावंडे, हरिभक्त परायण श्याम सुंदर महाराज तसेच संमेलनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
शरद पवार यावर सविस्तर बोलताना म्हणाले की, भागवत वारकरी संमेलन ही संकल्पना माणूसकी घराघरात पोहोचविण्याचा संदेश करते. आज समाजामध्ये एक अस्वस्थता आहे. चुकीच्या प्रवृत्ती प्रोत्साहित करण्याची भूमिका काही घटक घेत आहेत. त्यामुळे सामान्य माणूस जो अस्वस्थ आहे त्याची अस्वस्थता काढून टाकण्यासाठी त्याला मानसिक समाधान देण्यासाठी त्याचं मन शक्तिमान करण्यासाठी जो काही पर्याय समाजासमोर आहे. त्याच्यामध्ये भागवत वारकरी संमेलनाचा विचार आपण दुर्लक्षित करू शकत नाहीत. आज सबंध देशामध्ये वेगवेगळे घटक, वेगवेगळ्या पद्धतीने आपली पावलं टाकत आहेत. पण दुसऱ्या बाजूने अन्याय, अत्याचार हे चित्र एका बाजूला, धर्म आणि कट्टर विचाराच्या माध्यमातून कर्मकांड आणि या गोष्टींचा पुरस्कार ही भूमिका दुसऱ्या बाजूला आपल्याला बघायला मिळते. माझ्या मते कुठलाही धर्म चुकीच्या प्रवृत्तीच समर्थन कधी करत नाही. चुकीचे संस्कार कधी समाजावर करत नाही. योग्य विचार देण्याच्या संबंधित खबरदारी घेतो.
या ठिकाणी माझ्याअगोदर अनेकांचे विचार आपण ऐकले. त्याच्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली. हा देश अनेक जाती-धर्मांचा भाषेचा असला तरी त्याचा मूळ विचार जो आहे. तो विचार हिंदूंचा असो की मुस्लिमांचा की अन्य घटकांचा असो त्यांच्यामध्ये एक प्रकारचे सामंजस्य निर्माण करण्याची भूमिका प्रकर्षाणे मांडली जाते. त्याचाच पुरस्कार करणे, ते रुजवणं, ते शक्तिशाली करणे आज खऱ्या अर्थाने आवश्यक आहे. ती आवश्यकता भागवत वारकरी संमेलनाच्या माध्यमातून आपण समाजामध्ये रुजवू शकतो असे शरद पवार म्हणाले.
आज सबंध देशामध्ये एका बाजूला सनातन धर्म आणि दुसऱ्या बाजूला भागवत धर्म यासंबंधीची चर्चा हल्ली मोठ्या प्रमाणावर होत असते. मी एकच गोष्ट सांगतो आम्ही याकडे बघत असताना सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करणारी विचारधारा आहे. समाजाला शक्तिशाली करणारी ही विचारधारा आहे, देशाला कष्टकऱ्यांची महासत्ता बनवणारी जी विचारधारा ती विचारधारा आम्हा सर्वांच्या दृष्टीने अंतिम विचारधारा आहे. ही विचारधारा वारकरी संस्थान आहे. ती विचारधारा जतन करणं ही तुमची माझी जबाबदारी आहे, असेही शरद पवार यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.
