मुंबईत कोरोना चाचण्या वाढवण्याची गरज…
मुंबई, दि. २ सप्टेंबर २०२०:
मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना त्या प्रमाणात चाचण्यांची संख्या वाढत नाही. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ १४ टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत तर राज्यात ४२ टक्के. त्यामुळे मुंबईत तातडीने कोरोना चाचण्या वाढवा, अशी मागणी विधान सभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात फडणवीस म्हणतात की, मुंबईत जुलै महिन्यात दररोज ६५७४ चाचण्या केल्या जात होत्या त्या आता ७७०९ आहेत, ही वाढ केवळ १४ टक्के आहे. राज्यात मात्र चाचण्यांची ही वाढ ४२ टक्के आहे. महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचा दर १८.४४ टक्के इतका असून तो राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. महाराष्ट्रातील दररोजच्या कोरोना चाचण्यांचे प्रमाण देशातील इतर राज्यांच्या तुलनेतही कमीच आहे. संसर्गदर देशाच्या तुलनेत कमी असणार्या राज्यात सुद्धा महाराष्ट्र नाही, असे फडणवीस म्हणाले,
फडणवीस यांनी नुकतेच उत्तर महाराष्ट्राचा दौरा करून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यानंतरही त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून कोरोनासंदर्भात करावयाच्या उपाय योजनांसंदर्भात सुचना केल्या होत्या.
