मोदींनी फक्त पक्ष फोडाफोडीचे काम केले.
मोदींनी फक्त पक्ष फोडाफोडीचे काम केले.
जळगाव, दि. ९ सप्टेंबर;
देशात नरेंद्र मोदींचं राज्य आहे, त्यांना सत्तेत येऊन नऊ वर्षे झाली या काळात मोदींनी काय केलं? त्यांनी फक्त इतर राजकीय पक्षांना फोडण्याचं काम केलं. त्यांनी शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली. त्यांनी फक्त एकच गोष्ट केली ती म्हणजे फोडाफोडीचं राजकारण व लोकांनी आपल्या हातात दिलेली सत्ता लोकांसाठी वापरण्याऐवजी सीबीआय, ईडीच्या माध्यमातून खोटे खटले दाखल करण्याचं काम केलं, असा हल्लाबोल राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

जळगाव येथील स्वाभिमानी सभेत बोलताना पवार पुढे म्हणाले की, काहीही संबंध नसताना आमच्या एका महत्त्वाच्या सहकाऱ्याला काही महिने तुरुंगात टाकायचं काम त्यांनी केलं. नवाब मलिकांनाही तुरुंगात टाकलं, अनेकांना तुरुंगात टाकलं. लोकांनी दिलेली सत्ता लोकांना सन्मानाने जगता येईल यासाठी वापरण्याऐवजी भाजपाने सत्तेचा गैरवापर केला.

देशाचे पंतप्रधान मोदी भोपाळला गेले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका टिप्पणी केली. त्यांनी सांगितलं की हे भ्रष्ट लोक आहे. आमच्याकडे अनेकांची माहिती आहे. माझं मोदीसाहेबांना नम्रतेनं एकच सांगणं आहे. जर कुणी चुकीचं काम केलं असेल तर त्यांच्याविरुद्ध खटला भरा. चौकशी करा. पण तुमचे आरोप खोटे ठरले तर तुम्ही स्वत:ला काय शिक्षा देणार? हेही संपूर्ण देशाला सांगा. खोटे आरोप करणं हे देशाच्या हिताचं नाही..
महाराष्ट्राचा इतिहास जर पाहिला तर खानदेशाचा इतिहास महाराष्ट्राच्या इतिहासाचा अत्यंत अभिमानाचा असल्याचे दिसून येते. येथे आलो तर बहिणाबाई चौधरी, रान कवी ना. धो. महानोर, सानेगुरुजी, खानदेशाचा इतिहास समृध्द करण्यासाठी मोलाची कामगिरी केली. देशाच्या स्वातंत्र्याआधी काँग्रेसची अनेक अधिवेशनं झाले. पण काँग्रेसचं पहिले ग्रामीण भागातलं अधिवेशन खानदेशात झालं. त्यात स्वत: महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, मौलान आझाद आल्याचेही शरद पवार साहेब यांनी सांगितले आहे
एकेकाळी संबंध देशात आणि देशाबाहेर एक नंबरची केळी ही खानदेशातून जात होती. तसेच उत्तम शेतीचा आदर्श लोकांना पाहायला मिळत होता. एकप्रकारे दुष्काळाचं संकट आहे. शेतकरी अडचणीत आहे. पाणी नाही, पाण्याचे साठे कमी झाले. धरणात पाणी नाही, दुहेरी पीक पेरणी केली. पण ती पडली. देशाला एक नंबरचा कापूस देणारा हे राज्य, जिल्हा अडचणीत संकटात आहे. ही स्थिती बदलायची आहे. पण हे चित्र एकदम बदलू शकत नाही. पण आपल्या हातातील सत्ता या लोकांसाठी वापरली तर हे चित्र नक्की बदलू शकते असेही शरद पवार म्हणाले.
