‘इंडिया’ला घाबरलेल्या मोदींची घाईघाईत ३८ पक्षांची बैठक.
‘इंडिया’ला घाबरलेल्या मोदींची घाईघाईत ३८ पक्षांची बैठक.
मुंबई, दि. २९ ऑगस्ट ;
इंडिया आघाडीच्या बैठकीवर भाजपाकडून होत असलेली टीका हास्यास्पद आहे. देशभरातील २८ पक्ष मोदी सरकार विरोधात एकत्र आले आहेत, बंगलुरु मध्ये इंडिया आघाडीची दुसरी बैठक होत असतानाच नरेंद्र मोदी यांनी घाईघाईने एनडीएची बैठक बोलावली. इंडिया आघाडीची ताकद पाहून मोदी व भाजपा घाबरलेले आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
चव्हाण म्हणाले की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात ६२ टक्के लोकांनी मतदान केले होते. यावेळी मतांचे विभाजन होऊ द्यायचे नाही असे विरोधी पक्षांनी निश्चित केले आहे. इंडिया आघाडी भक्कमपणे उभी आहे म्हणून भाजपाकडून मतविभाजन व्हावे यासाठी BRS सारख्या पक्षांना पुढे केले जात आहे.
राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकारमध्ये अंतर्विरोध आहे. या सरकारला एक वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला तरी अजून त्यांना पालकमंत्री नियुक्त करता आले नाहीत, मंत्रिमंडळ विस्तार करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. निधी वाटपावरूनही सत्ताधारी पक्षांमध्ये वाद सुरु आहेत. सरकारधील वादाचा फटका शेतकरी, तरुण, कामगार, व राज्यातील गुंतवणूकीवर होत आहे.
महाराष्ट्रात अस्थिर राजकीय परिस्थिती असल्याने कोणताही मोठा गुंतवणुकदार येत नाही. वेदांता फॉक्सनसारखा मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेला. आताही ऍपल कंपनीने ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तामिळनाडू, कर्नाटक राज्यात केली आहे. यामुळे राज्यातील तरुण रोजगारांपासून वंचित राहत आहेत. कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क वाढवल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. जपान, चीन मध्ये कांदा २००-३०० रुपये किलो आहे, कांदा निर्यात केला तर शेतकऱ्याला जास्त पैसे मिळतील म्हणून केंद्र सरकारने तात्काळ निर्यात शुल्क रद्द करावे, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
या पत्रकार परिषदेला माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, सोशल मीडियाचे राज्य प्रमुख विशाल मुत्तेमवार, प्रदेश प्रवक्ते भरतसिंह आदी उपस्थित होते.
