संविधान कोणीही बदलु शकत नाही..
संविधान कोणीही बदलु शकत नाही..
सांगोला, दि. २९ ऑगस्ट –
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान सर्वश्रेष्ठ असून ते कोणीही कधीही बदलू शकत नाही. काँग्रेस आणि विरोधी पक्षाकडून संविधान बदलण्याच्या पसरवण्यात येणाऱ्या अफवावर विश्वास ठेवू नका असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी केले.
सांगोला तालुक्यातील कोळे गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार स्मारकाचे लोकार्पण रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी विचारमंचावर आमदार डॉ. शहाजी बापू पाटील, माजी आमदार दिपक साळुंखे पाटील, रिपाइंचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, सोमनाथ भोसले, खंडू सातपुते, जितेंद्र बनसोडे, विजय साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाड चवदार तळे,भिमा-कोरेगाव येथील अभिवादन सभांना भारतीय दलित पँथरच्या काळात आम्ही सुरुवात केली. कोळे गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी आणून गेली अनेक वर्षे त्या जतन करुन येथे उभारण्यात आलेले अस्थिविहार स्मारक ऐतिहासिक आहे. या स्मारकाला अडीच एकर जमिन शहाजी मोरे यांनी दिली. तसेच जिल्हा परिषद सदस्य ऍड.सचिन देशमुख, विकास काटे, रंगनाथ मोरे, श्रीकांत मोरे, विशाल मोरे, भीमराव काटे यांनी चांगले काम केले. या स्मारकाला जेवढी लागेल तेवढी शासकीय जमिन मिळवूया तसेच या स्मारकाला भरीव निधी मिळवून देण्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले.
कोळे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार स्मारकाला 25 करोड पर्यंतचा निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिले.
