उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभणास बळी पडू नये…
उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभणास बळी पडू नये…
मुंबई, दि. २४ ऑगस्ट :
ग्रामविकास विभागाच्या परिक्षेची संपूर्ण भरती प्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे सदर परिक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पध्दतीने होणार आहे. तथापि, काही समाज विघातक प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून प्रलोभन दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा फसवणूकी पासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी. तसेच अशा प्रकारच्या कोणत्याही प्रलोभणास बळी पडू नये असे आवाहन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
मंत्री महाजन म्हणाले की,ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत राज्यातील 34 जिल्हा परिषदा अंतर्गत गट – क मधील 30 संवर्गातील एकूण 19 हजार 460 इतकी रिक्त पदे सरळसेवेने भरण्याबाबतची जाहिरात दि. 05 ऑगस्ट, 2023 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. जाहिरातीनुसार दि. 05 ऑगस्ट, 2023 ते 25 ऑगस्ट, 2023 पर्यत ऑनलाईन पध्दतीने उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.
ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले आहे की, फसवणूक झाल्यास शासन अथवा जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही. अशा प्रकारे कोणतीही व्यक्ती परिक्षेसंदर्भात आर्थिक मागणी करीत असल्याबाबत निदर्शनास आल्यास त्यांच्या विरूध्द जवळच्या पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात यावी, असे सर्व उमेदवारांना आव्हान करण्यात येत आहे.
