शरद पवारांबद्दल चुकीचे बोललोच नाही!
शरद पवारांबद्दल चुकीचे बोललोच नाही!
मुंबई दि. २१ ऑगस्ट –
अजित पवार गटातील नेते व मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांबद्दल केलेल्या विधानाने राजकीय वातावरण तापले आहे. हे प्रकरण अंगलट येत असल्याचे दिसताच वळसे पाटील यांनी सारवासारव केली आहे. बीडच्या भाषणात शरद पवार यांच्यावर टीका केलेली नाही किंवा काही चुकीचे बोललो नाही असा खुलासा वळसे पाटील यांनी केला आहे.
एवढा मोठा उत्तुंग नेता असताना महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्या पाठीशी उभे रहायला हवे होते, ते घडले नाही त्याबद्दलची खंत आपण बोलून दाखवली. ही खंत केवळ कालच्या भाषणातच बोलून दाखवली असे नाही. यापूर्वीही पक्षाच्या अनेक बैठकांमध्ये तसेच मेळाव्यांमध्ये जाहीरपणे बोललो आहे असेही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.
जे राजकीय विश्लेषण कार्यकर्ते व जनतेसमोर मांडले होते, त्याचा प्रसारमाध्यमांनी अर्थ समजून न घेता हा विषय चुकीच्या पद्धतीने दाखवला आहे असेही दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले…शरद पवार यांच्याबद्दल कुठलाही चुकीचा शब्द जाणे शक्य नाही. तरीसुद्धा हा जो गैरसमज निर्माण झालेला आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असे वळसे पाटील यांनी म्हटले आहे.
