राहुल गांधी यांची ‘अर्थव्यवस्था की बात’.
मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांची पोलखोल
नवी दिल्ली, दि. ३१ ऑगस्ट २०२०:काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला. देशाची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असून याला मोदी सरकार जबाबदार आहे, देवाची करणी नाही. लॉकडाऊनचा निर्णयही अचानक घेतलेला नव्हता तर विचारकरुन, जाणीवपूर्वक आखलेल्या योजनेचा तो भाग होता.देशात असंघटीत क्षेत्र मोठे असून या क्षेत्रावरच हल्ला करण्याचा हा नियोजित कट आहे. शेतकरी, छोटे, लहान व मध्यम उद्योग क्षेत्र हे या अंघटीत क्षेत्रात येते. हे क्षेत्र संपवून तुम्हाला गुलाम बनवण्याचा हा भयानक डाव असल्याचा घणाघाती आरोपी राहुल गांधी यांनी केला आहे.
नोटबंदी, जीएसटी आणि लॉकडाउनच्या निर्णयांची पोलखोल करत राहुल गांधी यांनी ‘अर्थव्यवस्था की बात’ या व्हिडीओतून मोदी सरकारच्या धोरणांची पोलखोल केली. २००८ मध्ये जगात आलेल्या आर्थिक महामंदीत अमेरिका, जपान, युरोप, चीनला मोठा फटका बसला. बँका कोसळल्या, एकपाठोपाठ एक कंपन्या बंद होत गेल्या. पण भारतात याचा काहीही परिणाम झाला नाही. त्यावेळी भारतात युपीएचे सरकार होते. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांनी देशातील परिस्थितीचा विचार करुन आखलेल्या मजबूत आर्थिक धोरणांमुळे संघटीत व असंघटीत या दोन्ही क्षेत्रावर या महामंदीचा फारसा परिणाम जाणवला नाही. जोपर्यंत भारतातील असंघटित व्यवस्था मजबूत राहिल, तोपर्यंत भारतावर कोणतेही आर्थिक संकट येऊ शकत नाही. पण मोदी सरकारने यातील अंघटीत क्षेत्र उद्धस्थ करणाऱ्या धोरणांना चालना दिली, त्याचेच परिणाम देश भोगत आहे.
मागील सहा वर्षात भाजपा सरकारने असंघटित क्षेत्रावर आक्रमण केले आहे. असंघटित क्षेत्रात प्रचंड पैसा आहे. पण त्याला हे लोक हात लावू शकत नाहीत. असंघटित क्षेत्र ९० टक्क्यांपेक्षा जास्त रोजगार देते. ज्या दिवशी हे असंघटित क्षेत्र संपेल, त्या दिवसापासून रोजगार निर्माण करू शकणार नाही आणि तेच मोडीत काढण्याचा उद्योग सुरु आहे. हे आक्रमण ओळखा आणि एकजूट होऊन याविरुद्ध लढा, असे आवाहनही राहुल गांधी यांनी केले आहे.