अलमट्टीतील विसर्ग १ लाख क्युसेक्स करा.
अलमट्टीतील विसर्ग १ लाख क्युसेक्स करा.
मुंबई, दि. २७ जुलै.
धरणक्षेत्रात असलेल्या पावसाच्या जोरामुळे कोल्हापूर, सांगली परिसरामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अलमट्टी धरणातील पाण्यामुळे गंभीर पूरपरिस्थिती उद्भवू नये यासाठी महाराष्ट्र व कर्नाटकची मंत्री स्तरीय बैठक तातडीने आयोजित करावी आणि अलमट्टी धरणाचा विसर्ग १ लाख क्युसेक्स पर्यंत वाढवण्याच्या सूचना देण्यात याव्यात अशी मागणी विधान परिषदेतील कॉंग्रसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केली.
कोल्हापूर – सांगली परिसरातील संभाव्य पूरस्थितीबाबत २८९ सूचना क्रमांक २ नुसार आमदार सतेज पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधले. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली असून धोका पातळीकडे वाटचाल सुरु आहे. परिणामी कोल्हापूर सांगली जिल्ह्यात पुराची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.
अलमट्टी धरणातील पाण्यामुळे गंभीर पूरपरिस्थिती उद्भवू नये म्हणून उपाय योजना करण्यासाठी यापूर्वी दरवर्षी दोन्ही राज्यांची मंत्री समितीची बैठक घेण्यात येत होती. महापुरावर 2021 व 2022मध्येही दोन्ही राज्यातील मंत्री स्तरावरील बैठका झाल्या होत्या. मात्र यावर्षी ही बैठक झालेली नसून ती तातडीने घेण्यात यावी. महापुराला कारणीभूत ठरणाऱ्या अलमट्टी धरणातील विसर्ग १ लाख क्युसेक्स पर्यंत वाढवण्याच्या सूचना कराव्यात. अलमट्टीतील पाण्याची उंची 516.74 पर्यंत गेली असुन ती 15 ऑगस्ट पर्यत 517 वर स्थिर ठेवण्यासाठी कर्नाटक सरकारशी बोलावे, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.
