सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला न्याय देणारे सरकार !
सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला न्याय देणारे सरकार !
सातारा, दि. ३० :-
राज्य शासन हे सर्वसामान्य व गोरगरीब जनतेला न्याय देणारे शासन आहे. गेल्या एक वर्षाच्या काळात शासनाने अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. आजची वर्षपूर्ती आपण विकास कामांच्या माध्यमातून साजरी करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
पाटण तालुक्यातील मरळी, दौलतनगर येथे १२८ गावातील १२२ कोटी ५९ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे ई – भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी मुख्यमंत्री दूरदृष्य प्रणाली द्वारे सहभागी झाले होते. या वेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई आदी उपस्थित होते.
आजच्या भूमिपूजन होणाऱ्या कामामुळे १२८ गावातील लोकांना लाभ होणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शासनाने अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. ३२ नव्या सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवून आता ही योजना राज्यातील सर्व नागरिकांना लागू केली आहे. त्यासाठी पिवळे, केशरी शिधा पत्रिका अशी कोणतीही अट नाही. तसेच या योजनेत आता ५ लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय सहाय्य मिळणार आहे.
सिंचनाच्या सुविधा वाढवण्यात येत आहे. जलयुक्त शिवार, गाळ मुक्त धारण गाळ युक्त शिवार अशा योजना पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. शासन आपल्या दारीच्या माध्यमातून आज प्रशासन लोकांच्या घरी पोहचले आहे. ही एक क्रांती आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. महिलांना एस. टी प्रवासात ५० टक्के सवलत, केंद्राच्या किसन सन्मान योजनेत राज्य शासनाच्या आणखी ६ हजार रुपयांची भर घालून आता १२ हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बचत गटांना त्यांचे उत्पादन विक्रीसाठी मदत करण्यात येईल.
