BRS पक्ष शेतकरी, गरिब, दलितांची टीम !
BRS पक्ष शेतकरी, गरिब, दलितांची टीम !
पंढरपूर, दि. २७ जून:
तेलंगणातील भारत राष्ट्र समितीच्या महाराष्ट्रातील एंट्रीने राज्यातील सर्वच पक्षाने त्यांच्यावर टीकेची झोड उडवली पण या टीकेला बीआरएसचे अध्यक्ष तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सडेतोड उत्तर देत, आम्ही कोणाचीही बी टीम नाही तर शेतकरी, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक यांची टीम आहोत असा हल्लाबोल करत चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रातील आपला राजकीय अजेंडा स्पष्ट केला.
पंढरपूरचे माजी आमदार भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला तर सोलापुर मुक्कामी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपामधील अनेक नेत्यांनी केसीआर यांची भेट घेऊन चर्चा केली. राज्यातील अनेक नेते बीआरएसच्या संपर्कात असल्याचे कळते.
हैदराबादहून ६०० गाड्यांचा ताफा घेऊन निघालेले केसीआर यांनी सोलापुरात मुक्काम केला व सकाळी पंढरपूरकडे रवाना झाले. पंढरपुरात त्यांनी काही सहकाऱ्यांसह विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले तर इतर मंत्री, आमदार खासदारांनी नामेदव पायरीचे दर्शन घेतेले. पंढरपुरात वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्यामुळे मोजक्याच लोकांना मंदिरात सोडण्यात आले होते. भारत राष्ट्र समिती या पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार करण्याची के. चंद्रशेखर राव यांची योजना आहे.
तेलंगणात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात आल्या आहेत, जे तेलंगणात होते ते महाराष्ट्रात का होत नाही. महाराष्ट्रातील राजकीय नेते म्हणतात यामुळे राज्याचे दिवाळे निघेल पण दिवाळे राज्याचे नाही तर राजकीय नेत्यांचे निघेल व दिवाळी शेतकऱ्यांची होईल असे केसीआर म्हणाले. आम्ही महाराष्ट्रात आलो तर सर्व राजकीय पक्षांनी त्याची धास्ती का घेतली आहे? देशात ७० टक्के शेतकरी आहेत पण कोणत्याच पक्षाने ‘अब की बार’ किसान की सरकार’ असे म्हटलेले नाही, असा टोला राव यांनी लगावला.
