पंढरपूर आषाढी वारीच्या समन्वयासाठी दोन मंत्री….
पंढरपूर आषाढी वारीच्या समन्वयासाठी दोन मंत्री….
मुंबई, दि. २७ जून :
पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांना सुविधा उपलब्ध करणे तसेच सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन मंत्र्यांवर समन्वयक मंत्री म्हणून जबाबदारी टाकली आहे.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे दोन मंत्री समन्वयक मंत्री म्हणून काम पाहतील.
पंढरपुरात विविध राजकीय नेत्यांच्या स्वागताचे फलक आणि बॅनर्स लावण्यापेक्षा विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावा असे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आ.ए.
मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर येथे जाऊन आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांसाठी केलेल्या व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेतला तसेच वारकऱ्यांची संवादही साधला यावेळी त्यांच्या लक्षात आले की पंढरपुरात मोठ्या प्रमाणावर विविध पक्षांनी त्यांच्या राजकीय नेत्यांचे स्वागताचे बॅनर्स आणि पोस्टर्स लावले आहेत. पंढरपूरला राज्यातील विविध भागातून लाखो वारकरी येतात.
विठ्ठल रखुमाई हे त्यांचे श्रद्धास्थान आहे, अशावेळी राजकीय पक्षांचे बॅनर्स लावण्यापेक्षा मजल दरमजल विठूनामाचा गजर करत येणाऱ्या वारकऱ्यांचे स्वागत करणारे फलक लावले पाहिजेत असे मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला सुचवले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना देखील आवश्यक त्या सूचना केल्या.
